मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने इंधनदरात कपात केल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोलियम कंपन्यांनी वाहन चालकांच्या खिशाला कात्री लावली आहे. पेट्रोलच्या दरात 14 पैसे, तर डिझेलच्या दरात 29 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे इंधनदरकपातीचा दिलासा तात्पुरता होता का, असा सवाल वाहनचालक विचारत आहेत.


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम म्हणून इंधनाच्या दरांमध्ये देशातही सातत्याने वाढ होत होती. या दरवाढीपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा 4 ऑक्टोबरला केली. त्याला तातडीने प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात पेट्रोलवरील मूल्यवर्धित करामध्ये अडीच रुपयांची घट करण्याची घोषणा केली. यामुळे राज्यात लिटरमागे पेट्रोल एकूण 5 रुपयांनी स्वस्त झालं होतं.

पेट्रोलपाठोपाठ डिझेलही स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार, डिझेलच्या दरात लिटरमागे 56 पैसे करसवलतीसह एकूण 1 रुपये 56 पैशांची कपात करण्यात आली. यामुळे केंद्राचे अडीच रुपये आणि राज्याचे 1 रुपये 56 पैसे असे मिळून लिटरमागे 4 रुपये 6 पैशांची कपात झाली होती.

पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याने विरोधी पक्षांना भाजप सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. इंधनाचे दर पुन्हा वाढल्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांनीही संताप व्यक्त केला आहे.

राहुल गांधींच्या टीकेवर जेटलींचं उत्तर

इंधनाच्या किमतीत वाढ होत असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर टीका केली होती, त्याला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी उत्तर दिलं. 'जेव्हा भाजप सरकार सामान्य नागरिकांना महागाईच्या जाळ्यातून बाहेर काढत होतं, तेव्हा राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी ट्वीट करण्यात आणि प्रसारमाध्यमांशी बोलण्यात दंग होते, अशी टीका जेटलींनी केली.