Pariksha Pe Charcha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी तालकटोरा स्टेडियममध्ये 1000 विद्यार्थी उपस्थित आहेत. पीएम मोदी म्हणाले की, 'हा कार्यक्रम मला खूप प्रिय आहे, परंतु कोरोनाच्या काळात तुम्हाला त्यापैकी बहुतेकांना भेटता आलं नाही. हा माझ्यासाठी आनंददायी कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी तुम्हा सर्वांना भेटलो. मला वाटत नाही की, तुम्ही परीक्षेला घाबराल. तुमच्या पालकांना परीक्षेची भीती वाटेल. अनेक पालकांना मुलांपेक्षा जास्त टेन्शन आहे.  


परीक्षा ही आयुष्यातील साधी गोष्ट : पंतप्रधान मोदी 


विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मनात तयार करा की, परीक्षा जीवनाची साधी गोष्ट आहे. आपल्या विकास यात्रेचे हे लहान टप्पे आहेत. या टप्प्यातून आम्हीही गेलो आहोत. यापूर्वीही आम्ही अनेकदा परीक्षा दिली आहे. जेव्हा हा विश्वास निर्माण होतो. पुढच्या काळात घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी हा अनुभव ताकद म्हणून  कामी येतो." 


ऑनलाइन अभ्यास करण्याचे आव्हान!


खिल्ली उडवत पंतप्रधानांनी विचारलं, तुम्ही ऑनलाइन अभ्यास करताना अभ्यास करता की, रील पाहता? हे ऑनलाइन-ऑफलाइनबद्दल नाही, तर एकाग्रतेबद्दल आहे. PM म्हणाले की, दिवसभरात स्वतःसाठी थोडा वेळ काढा, जेव्हा तुम्ही ऑनलाइन/ऑफलाइन ऐवजी 'इनरलाइन' असाल.


देशभरातील हजार विद्यार्थी सहभागी


'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आयोजित केलं जाणार आहे. परीक्षा पे चर्चाचा हा पाचवा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमामध्ये इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे 1 हजार विद्यार्थी सहभागी होतील. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणातील सरकारी आणि खाजगी शाळांमधील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही केले जाणार आहे.


कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था


यावेळी भारताचे सर्व राज्यपाल राजभवनात विद्यार्थी आणि शिक्षक 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले आहेत. केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्थांमध्येही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.


2018 साली 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाला सुरुवात


'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाला 2018 साली सुरुवात झाली. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी पंतप्रधान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना तणावमुक्त करण्याबाबत चर्चा करतात. कोरोनामुळे गेली दोन वर्ष हा कार्यक्रम ऑनलाईन झाला होता.