नवी दिल्ली : लोकसभा आणि देशभरातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली असून नवी दिल्ली येथे हे बैठक सुरु आहे. या बैठकीला मोदींसह देशभरातील अनेक पक्षांचे प्रमुख उपस्थित आहेत. परंतु देशभरातील अनेक मोठ्या पक्षातील नेत्यांनी या बैठकीकडे दुर्लक्ष केले आहे.


मोदींनी बोलावलेल्या या बैठकीवर काँग्रेसने बहिष्कार घातला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बहिष्कार घातला आहे. ममता बॅनर्जी यांनी संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच तेलुगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू आणि बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावतीही या बैठकीला अनुपस्थित आहेत.

दरम्यान, या बैठकीत एक देश, एक निवडूक, 2022 मध्ये स्वातंत्र्याच्या 75 वर्षांपूर्तीबद्दल सोहळा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी प्रल्हाद जोशींना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'एक राष्ट्र, एक निवडणूक' हा संवेदनशील विषय आहे. यावर इतक्या कमी वेळात चर्चा होऊ शकत नाही. याविषयी सरकारने एक श्वेतपत्रिका जारी करावी. तसेच स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष आणि महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या उत्साहात सहभागी होणार आहे.



दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी, सीपीआयचे सीताराम येचुरी आणि सुधाकर रेड्डी, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यासह रामविलास पासवान आणि फारुक अब्दुल्ला उपस्थित आहेत. तर सरकारकडून मोदींसह गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नरेंद्र सिंह तोमर उपस्थित आहेत.