On This Day In Historyआजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. 30 डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. आजच्याच दिवशी ऑल इंडिया मुस्लिम लीगची (All-India Muslim League) स्थापना झाली होती. बांगलादेश स्वातंत्र्य झाल्यानंतर याचं नाव मुस्लीम लीग असं झालं. आजच्याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे तिरंगा फडकावला होता. (first time tricolour hoist by subhash chandra bose in port blair took control of land ) त्याशिवाय  भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. विक्रम साराभाई (Vikram Sarabhai Indian physicist) यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. त्याशिवाय इतिहासात अनेक घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. 


1803 : भारतातील दुसऱ्या मराठा युद्धाच्या पहिल्या टप्प्यात मराठा सरदार दौलतराव शिंदे आणि ब्रिटिश सरकार यांच्यात सुर्जी अर्जुनगावचा तह झाला


इंग्रज आणि दौलतराव शिंदे यांच्यात 1803 मध्ये सुर्जी अर्जुनगावचा तह झाला. या तहामुळे दोघांमध्ये सुरू असलेले युद्ध संपुष्टात आले. तहानुसार शिंदे यांनी ब्रिटिश रेसिडेंटला आपल्या दरबारात ठेवण्याचे मान्य केले व बसईचा तह मान्य केला.


1879 - संत रमण महर्षी यांचा जन्म (Ramana Maharshi)


आजच्याच दिवशी 1879 मध्ये तामिळनाडूतील तिरुचीमध्ये संत रमण महर्षी यांचा जन्म झाला होता. लोक संत रमण महर्षी यांना भगवान शिवचा अवतार म्हणतात. महर्षी रमण यांचं नाव वेंकटरमण  आहे, पण लोक त्यांना रमण म्हणत होते. 14 एप्रिल 1950 रोजी महर्षी रमण यांचं निधन झालं.


1887 - डॉ. कन्हैयालाल मुन्शी यांचा जन्म -
डॉ. कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी यांचा आजच्या दिवशी 1887 मध्ये जन्म झाला होता. डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री होते.  हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक होते. त्यांचं निधन  ८ फेब्रुवारी १९७१ मध्ये झालं होतं.


1902 : डॉ. रघू वीरा यांचा जन्म
आजच्याच दिवशी १९०२ मध्ये डॉ रघू वीरा यांचा जन्म झाला होता. भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार, वैदिक संस्कृत, तिबेटी, चिनी, मंगोलियन इत्यादी भाषांचे जाणकार म्हणून रघू विरा यांना ओळखलं जातं. त्यांचं निधन १४ मे १९६३ रोजी झालं होतं.  


1906: मुस्लिम लीगची स्थापना (All-India Muslim League)-
आजच्याच दिवशी 1906 मध्ये ढाका (Dhaka) येथे ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना (All-India Muslim League) करण्यात आली. नवाब आगा खान आणि नवाब मोहसीन-उल-मुल्क यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना केली. या घटनेतच भारताच्या फाळणीची बीजे रोवली गेली.  वकार-उल-मुल्क हे मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष होते. याने बंगालच्या फाळणीला पाठिंबा दर्शविला, स्वदेशी चळवळीला विरोध दर्शविला आणि आपल्या समुदायासाठी विशेष सुरक्षा आणि मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारांची मागणी केली. मुसलमानांच्या स्वतंत्र राजकीय संघटनेची स्थापना करण्यास ब्रिटिशही कारणीभूत होते. लॉर्ड व्हाइसरॉय मिंटो यांनी लावलेली फुटीरतेची व जातीयवादाची विषवल्ली फोफावण्यास वेळ लागला नाही. 1947 नंतर पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ऑल इंडिया मुस्लिम लीग 'मुस्लिम लीग' झाली.


1935 - मन्युअल आरोन यांचा जन्म - (Manuel AaronIndian chess Master)
आजच्याच दिवशी भारताचे पहिले चेस मास्टर मॅन्युअल आरोन यांचा जन्म झाला होता. भारताच्या चेस जगतावर मन्युअल आरोन यांनी दोन दशकं राज्य केलं. १९५९ ते १९८१ या कालावधीत मन्युअल आरोन नऊ वेळा चॅम्पियन राहिलेत.


1943 : नेताजींनी पोर्ट ब्लेअर येथे तिरंगा फडकावला (first time tricolour hoist by subhash chandra bose in port blair took control of land) -
आजच्याच दिवशी 1943 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये जिमखाना ग्राउंडवर भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला होता. त्यामुळे आजचा दिवस भारतीयांसाठी खूप खास आहे. वर्ल्ड वॉर टू डेटाबेसच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर, 1943 रोजी नेताजींनी पहिल्यांदाच भारतीय जमिनीवर तिरंगा फडकवला. हा झेंडा आझाद हिंद फौजेचा होता. आझाद हिंद फौजेची स्थापना 1942 मध्ये जपानमध्ये झाली होती.


1959 - हनुमाप्पा सुदर्शन यांचा जन्म  (Hanumappa SudarshanIndian social worker) -
आजच्याच दिवशी १९५९ मध्ये बेंगलोरमध्ये समाजसुधारक हनुमाप्पा सुदर्शन यांचा जन्म झाला. हनुमाप्पा सुदर्शन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन भारत सरकारनं सन्मानित केलं आहे. त्याशिवाय त्यांना अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत. हनुमाप्पा सुदर्शन यांनी करुणा ट्रस्टची स्थापना करत सामाजिक कार्य केलेय.


1971 विक्रम साराभाई यांचं निधन (Vikram Sarabhai Indian physicist) -


भारतीय वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई यांचं आजच्याच दिवशी 1971 मध्ये निधन झालं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली होती. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात डॉ. विक्रम साराभाई यांनी  विपुल संशोधन केलेय.  विक्रम साराभाई यांना त्यांच्या कामामुळे त्यांना 'भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार' असंही म्हटलं जातं. ब्रिटनमधून भारतात माघारी आल्यानंतर डॉ. विक्रम साराभाई यांनी 11 नोव्हेंबर 1947 रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली. इथूनच खगोलशास्त्र, भौतिकशास्त्रातील संशोधनाची पायाभरणी करण्यास सुरुवात केली. अवकाश क्षेत्रात आज भारत उंच भरारी घेत आहे. पण ज्या संस्था हे यश मिळवत आहेत, त्यांची पायाभरणी डॉ. विक्रम साराभाई यांनी केली.  


1975: हिंदी कवी, कथाकार आणि गझलकार दुष्यंत कुमार यांची पुण्यतिथी (Dushyant Kumar)


आज 30 डिसेंबर हा आधुनिक हिंदी कवी दुष्यंत कुमार यांची पुण्यतिथी आहे. 30 डिसेंबर 1975 रोजी भोपाळ येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी हिंदीतही अनेक गझल लिहिल्या ज्या खूप गाजल्या. यासोबतच त्यांनी अनेक कादंबऱ्या आणि साहित्यिक नाटकेही लिहिली आहेत. साये में धूप, दुहरी जिंदगी, खंडहर  आणि सूर्य का स्वागत हे त्यांचे काव्य आणि गझलसंग्रह आहेत.


1982 दत्ता धर्माधिकारी यांचं निधन (Datta Dharmadhikari) -
 अभिनेते आणि दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांचं आजच्याच दिवशी १९८२ मध्ये पुण्यात निधन झालं होतं. सतीची पुण्याई, धाकटी मेहुणी, भक्त पुंडलिक, नसती उठाठेव, मुझे सीने से लगा लो, सतीचे वाण, थांब लक्ष्मी कुंकू लावते, वैशाख वणवा, सुभद्रा हरण, क्षण आला भाग्याचा, सप्तपदी इ. अनेक चित्रपट आहेत. दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापुर येथे झाला.


1987 दत्ता नाईक यांचं निधन (Datta Naik) -
प्रसिद्ध चित्रपट संगितकार दत्ता नाईक यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. ३० डिसेंबर १९८७ मध्ये दत्ता नाईक यांचं निधन झालं होतं. 'औरत ने जनम दिया मरदों को..' यासारखी गाणी दत्ता नाईक यांनी संगितबद्ध अन् लिहिली आहेत. दत्ता नाईक हे गोवेकर अगदी लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत होते.  यातूनच त्यांना संगिताची आवड निर्माण झाली.


1990 रघुवीर सहाय यांचं निधन (Raghuvir Sahay)
आजच्याच दिवशी १९९० मध्ये प्रसिद्ध कवी आणि पत्रकार रघुवीर सहाय यांचं निधन झालं होतं.


1994 - रजत चव्हाण  यांचा जन्म -
तिरंदाज रजत चव्हाण  यांचा जन्म आजच्याच दिवशी १९९४ मध्ये झाला. रजत चव्हाण यांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेय. रजत चव्हाण यांनी हलाखीच्या परिस्थितीतून तिरंदाजी कला शिकली. रजत यांनी विविध स्पर्धेत अनेक पदकं जिंकली आहेत.


2002-03 - अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा विजय (AUS vs ENG)


आजच्याच दिवशी 2003 मध्ये अॅशेस मालिकेत इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. २-१ ने आघाडीवर असणाऱ्या ऑस्ट्रेलियानं आजच्याच दिवशी चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवत मालिकेवर कब्जा केला होता. ऑस्ट्रेलियानं अॅशेस मालिका 4-1 च्या फरकानं जिंकली होती.  मालिकावीर म्हणून इंग्लंडच्या मायकल वॉला सन्मानित करण्यात आले होते.


2003 - मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव (IND vs AUS) -
आजच्याच दिवशी मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला होता. विरेंद्र सेहनागच्या 195 धावांच्या बळावर भारताने पहिल्या डावात ३६६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर ऑस्ट्रेलियानं ५५८ धावांचा डोंगर उभारला होता. भारताचा दुसरा डाव २८६ धावंवर आटोपला होता. ९७ धावांचं आव्हान एक गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. या सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या रिकी पाँटिंगला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले.


2006: सद्दाम हुसेन यांना फाशी (Saddam Hussein)
आजच्याच दिवशी इराकचा माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेनला 2003 मध्ये सद्दाम हुसेन याला त्याच्या घरून अटक करण्यात आली होती. सद्दामला 5 नोव्हेंबर 2006 रोजी इराकी न्यायालयाने 1982च्या दुजैल येथील 148 शिया लोकांच्या हत्याकांडासाठी दोषी ठरवले होते आणि त्यानंतर 30 डिसेंबर 2006 रोजी फाशी देण्यात आली होती.


2007 - बिलावल १९ व्या वर्षी  पार्टी अध्यक्ष
बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतर १९ वर्षाच्या बिलावल यांना पाकिस्तान पीपल्स पार्टीचं अध्यक्ष करण्यात आले. २७ डिसेंबर रोजी बेनझीर भुट्टो यांची हत्या झाली होती. बेनिझिर भुट्टो (Benazir Bhutto) या पाकिस्तानच्या दोन वेळा पंतप्रधान राहिल्या होत्या. त्यांना सातत्याने ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. 27 डिसेंबर 2007 रोजी, रावळपिंडीत एका रॅलीमध्ये असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये भुट्टो यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच ३० डिसेंबर रोजी बिलावल याला पाकिस्तान पीपल्स पार्टीचं अध्यक्ष करण्यात आलं. त्यावेळी त्यांचं वय अवघे १९ इतकं होतं.