मुंबई: इतिहासात 28 सप्टेंबर हा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 1929 साली लता मंगेशकर यांचा जन्म झाला होता. आपल्या गायिकेच्या जोरावर लता मंगेशकरांनी बॉलिवूडवर एक वेगळीच छाप उमटवली. तसेच आजच्या दिवशीच केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं. 


1838- शेवटचा मुघल सम्राट बहादुरशाह जफर सम्राट बनला 


आजच्याच दिवशी, 28 सप्टेंबर रोजी मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट बहादुरशाह जफर त्याच्या बापाच्या मृत्यूनंतर सम्राट बनला. ब्रिटिशांनी मराठ्यांचा पराभव केल्यानंतर आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आणि बहादुरशाह जफर याला सत्तेवरुन पायउतार व्हावं लागलं. पण 1857 च्या उठावात क्रांतिकारकांनी बहादुरशाह जफर याला पुन्हा एकदा दिल्लीचा बादशाह घोषित केलं आणि ब्रिटिशांशी लढा पुकारला. नंतर ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेतली आणि बहादुरशाह जफर याला रंगून म्हणजे आताच्या म्यानमारला पाठवलं. 


1929- गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा जन्म  


गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूरमधील एका मध्यममवर्गीय कुटुंबात झाला. वयाच्या तेराव्या वर्षी लतादीदींनी संगीतक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आपल्या गायिकेच्या जोरावर लता मंगेशकरांनी बॉलिवूडवर एक वेगळीच छाप उमटवली. लता मंगेशकरांनी 20 भाषांमधील तीस हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकरांना 2001 साली 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. त्या आधी त्यांना पद्मभूषण (1969), पद्ममविभूषण (1999), दादासाहेब फाळके पुरस्कार (1989) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. 


2007- आंतरराष्ट्रीय रेबिज दिन साजरा


28 सप्टेंबर हा दिवस जगभरात रेबिज दिन म्हणून साजरा केला जातो. इंग्लंडच्या एका संस्थेकडून 2007 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. रेबिजबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. लसीचे जनक लुईस पाश्चर यांच्या निधनाच्या दिवशी म्हणजे 28 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात येतो. 


2012- ब्रिजेश मिश्रा यांचे निधन 


भारताचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा (Brajesh Mishra) यांचे आजच्या दिवशी, 28 सप्टेंबर 2012 रोजी निधन झालं होतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते त्यांचे मुख्य सचिव होते. 1999 मध्ये कारगिल युद्धामध्ये पंतप्रधान वाजपेयी यांना सल्ला देण्याची प्रमुख भूमिका त्यांनी बजावली होती. देशाच्या पहिल्या सुरक्षा सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 


2016 : इस्त्रायलचे माजी पंतप्रधान शिमोन पेरेज यांचे निधन 


इस्त्रायलचे माजी पंतप्रधान शिमोर पेरेज (Shimon Peres) यांचे 28 सप्टेंबर 2016 रोजी निधन झालं होतं. इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरु असलेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता, तो आजही आहे. पण 1993 साली शिमोन पेरेज यांनी इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) यांच्यामध्ये शांती करार करण्याची किमया केली होती. त्यांच्या या कार्याबद्दल 1994 साली त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. 


2018- शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 


केरळच्या शबरीमला अयप्पा मंदिरामध्ये (Shabarimale Swamy Ayyappa) 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेश बंदीचा निर्णय घालण्यात आला होता. शबरीमाला मंदिरात विराजमान अयप्पा स्वामी यांना ब्रह्मचारी मानलं जातं. या वयोगटातील महिलांच्या मासिक पाळीमुळे त्यांना या मंदिरात प्रवेश नाकारण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला होता. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवली आणि सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्यात यावा असा निर्णय दिला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं.