Coromandel Express Accident: ओडिशाच्या (Odisha) बालासोरमध्ये झालेल्या कोरोमंडल रेल्वे (Coromandel Express) अपघातात मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. या संपूर्ण घटनेमुळे देशभरात एकच खळबळ माजली. रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी अपघात स्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बचावकार्य युध्दपातळीवर सुरु असून एनडीआरएफ,रेल्वेच्या पथकाकडून आतापर्यंत अनेक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलेले आहे. या अपघातात बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा समावेश आहे. 


पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट देखील घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त केलं आहे. 'या अपघाताची चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच त्यांनी ओडिशाच्या नागरिकांचे देखील यावेळी आभार मानले. बचावरकार्यासाठी रेल्वेकडून युध्दपातळीवर करण्यात आल्याचं  पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं. 'ही घटना अनेक गोष्टी शिकवून गेली आहे, त्यामुळे आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी प्रयत्न सरकारकडून करण्यात येतील' असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. 


मृतांचा आलेख वाढताच!


शुक्रवारी संध्याकाळी बालासोरमधील बहनगा स्थानाकाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की, करोमंडल एक्सप्रेस रुळावरुन खाली उतरली. या अपघातात सुरुवातील मृतांची संख्या 50च्या आसपास होती मात्र त्यानंतर या रेल्वे अपघातातील मृतांचा आलेख वाढतच गेला. आतापर्यंत या अपघातात 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण गंभीर जखमी झाली आहेत. करोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच वेळी रुळावर आल्याने हा अपघात झाला. अनेक प्रवासी या अपघातात अडकले असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे संपूर्ण परिसरात गर्दी आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. एनडीआरएफ, रेल्वे यांच्या पथकाकडून अनेक लोकांना सुखरुप बाहेर देखील काढण्यात आले. परंतु मृतांचा आकडा जास्त असल्याने त्यांची ओळख पटवून देण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे. 


रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा


केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या संदर्भात रेल्वेमंत्र्यांकडून उच्चस्तरीय बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीत चौकशीचे आदेश रेल्वेमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी देखील यावेळी नागरिकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत ना या गोष्टीचा आढावा घेतला. 


विरोधकांचं टीकास्त्र


विरोधकांनी या घटनेवर टीका करत सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच या रेल्वेमध्ये कवच या सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात आला नव्हता. तसेच या रेल्वेमध्ये अपघात थांबवणारी प्रणालीच नव्हती असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तर या मार्गावर कवच ही प्रणाली उपलब्ध नव्हती असे भारतीय रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी सांगितले. 


पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे नेतृत्व करणारे सुधांशू मणी यांनी या दुर्घटनेत सहभागी असलेल्या दोन लोको पायलटची कोणतीही चूक नसल्याचं म्हटलं. फेब्रुवारीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये दोन मालगांड्यांमध्ये झालेल्या अपघातावेळी रेल्वेने लोको पायलटवर कारवाई केली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या:  


Odisha Train Accident: ...अन् 'त्या' अपघातानंतर लाल बहादूर शास्त्रींनी दिलेला रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा; काय घडलं होतं तेव्हा?