Odisha News : ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यातील न्यायालयाने सोमवारी 25 वर्षांपूर्वी भूसंपादन विरोधी आंदोलनादरम्यान एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या केल्याप्रकरणी सीपीआय नेते आणि माजी आमदार एन नारायण रेड्डी (Narayan Reddy) यांच्यासह 13 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण त्यातील 8 जणांचा या आधीच मृत्यू झाला आहे. 


बेरहामपूरच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी 1998 सालच्या एका खटल्याप्रकरणी माजी आमदार नारायण रेड्डी यांच्यासह 13 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 1998 मध्ये टाटा कंपनीची जमीन ताब्यात घेताना पोलिस आणि जनता आमने-सामने आले होते. या घटनेत पोलीस निरीक्षक विनोद मेहर यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा आता निकाल लागला असून न्यायालयाने नारायण रेड्डी यांच्यासह 13 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


आरोपींनी सिंधीगाव येथे एका पोलाद प्रकल्पाच्या बांधकामासाठी भूसंपादनाला विरोध करताना पोलिसांच्या पथकावर बाँब फेकल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी विनोद मेहर या राखीव पोलिस निरीक्षकाचा 18 जून 1998 रोजी मृत्यू झाला होता. 


सरकारी वकील निरंजन पाधी यांनी सांगितले की, माजी आमदारासह 22 जणांना या प्रकरणात गोवण्यात आले होते. त्यापैकी 13 जण न्यायालयात हजर झाले इतर आठ जणांचा आधीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायमूर्ती राज कुमार दास यांनी 65 साक्षीदारांचे जबाब नोंदवून 25 वर्षे जुन्या खटल्याचा निकाल दिला. 


भूसंपादन विरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी आमदार एन नारायण रेड्डी (68) म्हणाले की, "आम्ही या निकालाने खूप निराश झालो आहोत. न्याय मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत."


Who Is Narayan Reddy Odisha Ex MLA : कोण आहेत एन नारायण रेड्डी? 


सीपीआयचे माजी आमदार एन नारायण रेड्डी तुरुंगात असताना 2004 मध्ये छत्रपूर मतदारसंघातून ओडिशा विधानसभेवर निवडून आले होते. पोलिस कर्मचाऱ्याच्या हत्येसह विस्थापनविरोधी आंदोलनाशी संबंधित अनेक गुन्हे त्याच्यावर आहेत. सीपीआयमच्या या नेत्याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.


घटनेच्या वेळी ते उपस्थित नसल्यामुळे त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा या प्रकरणातील बहुतेक आरोपींनी केला. त्यावेळी झालेल्या गोंधळात आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केल्याने गंजमचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचे सुरक्षा रक्षक जखमी झाले होते. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता.


ही बातमी वाचा: