पणजी : गोव्यात नक्कीच भूकंप होईल असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. माझ्यासोबत गोव्याचे माजी मंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई त्यांच्या काही आमदारांसोबत आमच्यासोबत आले आहेत. तसंच सरकारला पाठिंबा देणारे आमदारही आमच्यासोबत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. लवकरच गोव्यातचही चमत्कार दिसेल, असं ते म्हणाले. मात्र याआधी 2017 नंतर गोव्यात कोणत्या घडामोडी घडल्या होत्या, त्या पाहूया

2017 मध्ये निवडणूक झाली त्यावेळी...


काँग्रेस : 17
भाजप : 13
गोवा फॉरवर्ड : 3
मगो : 3
अपक्ष : 3
राष्ट्रवादी काँग्रेस : 1

काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असून देखील काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमतासाठी लागणारे 21 संख्याबळ गाठता आले नाही. त्यावेळी केंद्रात संरक्षण मंत्री असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असेल तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ असे गोवा फॉरवर्ड (3), मगो(3) आणि अपक्ष(3) यांनी सांगत सरकार बनवले. मनोहर पर्रिकर यांनी संरक्षणमंत्री पद सोडून गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्वीकारली.

त्यानंतर आमदारकीची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासात वाळपईचे आमदार असलेल्या विश्वजीत राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

गोव्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल : संजय राऊत


मनोहर पर्रिकर यांच्यासाठी पणजीमधून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी राजीनामा देऊन पणजीची जागा खाली केली होती. त्यामुळे पणजी आणि वाळपई मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या. त्यात अपेक्षेप्रमाणे मनोहर पर्रिकर आणि विश्वजीत राणे निवडून आले. विश्वजीत भाजपचे आमदार झाल्यानंतर भाजपचे संख्याबळ 14 झाले आणि काँग्रेसचे संख्याबळ 16 झाले.

मनोहर पर्रिकर हयात असे पर्यंत सर्वकाही सुरळीत होते. पर्रिकर यांची प्रकृती जास्तच बिघडली तेव्हा पर्याय काय याची चाचपणी सुरु झाली. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर सभापती असलेल्या साखळीचे आमदार प्रमोद सावंत यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजपचे संख्याबळ पुन्हा 13 झालं. प्रमोद सावंत यांच्या सरकारमध्ये गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई आणि मगो नेते सुदिन ढवळीकर यांना बढती देत उपमुख्यमंत्री करण्यात आले. प्रमोद सावंत सरकारने काही दिवसातच मगो मध्ये नाराज असलेल्या मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांना आपल्या जाळ्यात ओढले. 3 पैकी 2 आमदार मगोमधून फुटून भाजपमध्ये आल्याने भाजपचे संख्याबळ 15 तर मगोचे संख्याबळ 1 झाले. मगो सोडल्यानंतर मनोहर आजगावकर यांना उपमुख्यमंत्री आणि पर्यटन तर दीपक पाऊसकर यांच्याकडे ढवळीकर यांच्याकडील वजनदार असे बांधकाम खाते सोपवण्यात आले.

मगोच्या 2 आमदारांनंतर काँग्रेसच्या कारभारावर नाराज असलेल्या 10 आमदारांचा गट फुटून भाजपमध्ये सामील झाला. 10 आमदार भाजपमध्ये सहभागी होताच 25 संख्याबळ असलेल्या भाजपने उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांच्यासह गोवा फॉरवर्डच्या इतर दोन आणि पर्वरीचे अपक्ष आमदार तथा मंत्री रोहन खवटे यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

काँग्रेसमधील 10 आमदार भाजपमध्ये सहभागी झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या गळ्यात सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची माळ घालण्यात आली.

10 आमदार गेल्यानंतर काँग्रेसचे संख्याबळ 7 झाले. चंद्रकांत कवळेकर यांच्यासह 10 आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याकडे विरोधीपक्षनेते पद सोपवण्यात आले. 7 पैकी शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 5 वर आले आहे.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजीबरोबरच शिरोडा आणि मांद्रेमध्ये पोटनिवडणुका झाल्या. त्यात शिरोडा आणि मांद्रेमध्ये भाजपने गड राखला, मात्र पणजीत भाजपचा पराभव झाला. पणजीमधून काँग्रेसचे बाबूश मोन्सेरात विजयी झाले. मात्र काही दिवसातच काँग्रेसच्या 9 आमदारांना सोबत घेऊन मोन्सेरात भाजपमध्ये दाखल झाले.

सध्या भाजपकडे 27 आमदार असून त्यांना प्रियोळचे अपक्ष आमदार तथा कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचा पाठिंबा आहे.त्यामुळे भाजप कडे 40 पैकी 28 आमदार आहेत. विरोधी काँग्रेसकडे 5, गोवा फॉरवर्डकडे 3, मगोकडे 1 अपक्ष 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. सगळे एकत्र आले तर त्यांचे संख्याबळ 12 होते. 40 आमदारांच्या विधानसभेत बहुमतासाठी 21 आमदार आवश्यक आहेत. याचा अर्थ भाजप सरकार पाडायचे असेल तर त्यांचे 9 आमदार फोडावे लागणार आहेत.