जयललितांच्या निधनानंतर रजनीकांतचं चाहत्यांना आवाहन
एबीपी माझा वेब टीम | 09 Dec 2016 06:47 PM (IST)
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अवघं राज्य शोकसागरात बुडालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठा निर्णय घेतला. आपला वाढदिवस धामधुमीत साजरा न करण्याचं आवाहन रजनीकांतनी चाहत्यांना केलं आहे. 5 डिसेंबरच्या रात्री 11.30 वाजता जयललितांच्या निधनाचं वृत्त अपोलो रुग्णालयाकडून जाहीर करण्यात आलं. त्यानंतर तामिळनाडूत सात दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. रजनीकांत यांचा वाढदिवस येत्या सोमवारी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी आहे. सुपरस्टार रजनी 12 तारखेला वयाची 66 वर्ष पूर्ण करणार आहेत. दरवर्षीच लाडका 'थलैवा' रजनीचे चाहते त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करतात. रजनीकांत यांनी ट्वीट करुन आपल्या चाहत्यांना वाढदिवसाचे पोस्टर्स, बॅनर्स किंवा कोणतेही जाहीर कार्यक्रम न करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील दुःखद स्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. गेल्या वर्षी चेन्नई आणि इतर जिल्ह्यात आलेल्या भीषण पर्जन्यामुळे अनेक नागरिकांना मोठा फटका बसला होता. त्याच पार्श्वभूमीवर गतवर्षीही रजनीकांत यांनी आपला वाढदिवस साजरा केला नव्हता.