NDA Union Council of Ministers : नरेंद्र मोदी आज (9 जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. भाजपला बहुमत न मिळाल्याने यावेळी ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे नेतृत्व करणार आहेत. युतीचे सरकार असल्याने मित्रपक्षांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे. टीडीपी आणि जेडीयू हे भाजपनंतर एनडीएमध्ये सर्वात मोठे पक्ष आहेत. त्यांच्याकडे अनुक्रमे 16 आणि 12 खासदार आहेत. त्यामुळे भाजपचा टेकू या दोन पक्षांवर आहे. 


महत्वाची खाती भाजप आपल्याकडेच ठेवणार?


या निवडणुकीत टीडीपी आणि जेडीयू किंगमेकर म्हणून पुढे आले आहेत, त्यामुळे या दोन्ही पक्षांना केंद्रात मोठी मंत्रिपदे हवी होती. पण भाजपने सुरक्षाविषयक कॅबिनेट कमिटीशी संबंधित चारही मंत्रालये स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ही चार मंत्रालये म्हणजे गृह, संरक्षण, वित्त आणि परराष्ट्र व्यवहार ही आहेत. ही मंत्रालये मिळून CCS (सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती) तयार करतात आणि सर्व प्रमुख बाबींवर निर्णय घेतात. मात्र, अजूनही या मंत्रालयांसह इतर मंत्रालये कोणाकडे जाणार, याबाबत कोणतीही स्पष्टता आलेली नाही. फक्त मंत्री किती शपथ घेणार? याबाबत नावे समोर आली आहेत.  


टीडीपीने गृह मंत्रालय मागितल्याची चर्चा


दुसरीकडे, नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे गृह, संरक्षण, अर्थ आणि परराष्ट्र मंत्रालयांपैकी एकाची मागणी केल्याची चर्चा आहे. ही सर्व खाती मंत्रिमंडळातील सर्वात महत्त्वाची खाती आहेत. भाजप रस्ते आणि परिवहन मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालय तसेच लोकसभा अध्यक्षपदही आपल्या आघाडीच्या कोणत्याही साथीदाराला देणार नसल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही पक्ष दावा करु शकतात. आघाडी सरकारमधील कोणत्याही मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतल्यास त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यामुळे सत्तेची चावी त्यांच्याकडेच राहावी यासाठी टीडीपी आणि जेडीयू प्रयत्नशील आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या