नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी हे गेले काही दिवस त्यांच्या विधानांमुळे सातत्यानं चर्चेत आहेत. पाच राज्यांच्या निकालात भाजपला फटका बसल्यावर पक्षनेतृत्वानं त्यावर मौन बाळगलं आहे. मात्र गडकरींच्या बेधडक विधानांनी या शांततेवर ओरखडे मारले आहेत. मोदी-शाह यांच्या नव्या भाजपमध्ये जिथे बोलायला सगळे घाबरतात, तिथे गडकरींच्या वक्तव्यातून या घुसमटीला वाचा मिळेल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.


2014 नंतर भाजपमध्ये मोदी-शाहांच्या नव्या पर्वाचा उदय झाला. या नव्या भाजपच्या शैलीत अनेक ज्येष्ठांची घुसमट होते आहे. पण त्याबद्दल कुणी उघड बोलत नाही. विजयाची मालिका सुरु असताना मोदी-शाहांची पकड घट्ट राहिली होती. पण पराभवामुळे ती काहीशी सैल होताच अनेकांच्या दबलेल्या आवाजाला मोकळीक मिळत आहे. त्यामुळेच निकालानंतर यूपीत 'योगी फॉर पीएम' किंवा इकडे महाराष्ट्रात सोशल मीडियावर 'करो राजतिलक की तैयारी, आ रहे हैं नितीन गडकरी' यासारख्या घोषणा सुरु झाल्या होत्या.

गडकरींच्या मनात नेमकं चाललंय काय?
पाच राज्यांमधल्या पराभवानंतर भाजपच्या गोटात भयाण शांतता आहे. मोदी-शाहांनी या पराभवावर चुप्पीच साधली आहे. पण या निकालानंतरच्या एका आठवड्यात जर कुणाच्या विधानांची सर्वात जास्त चर्चा झाली असेल तर ते नितीन गडकरी. बिनधास्त, बेधडक ही जशी गडकरींच्या कामाची इमेज आहे तशीच ती बोलण्याचीही आहे. त्यामुळेच पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना जेव्हा ते म्हणाले की नेतृत्वानं अपयशाचीही जबाबदारी घ्यायला हवी, तेव्हा सगळ्यांचेच कान टवकारले. गडकरीच असं बोलल्यावर हा थेट मोदी-शाहांच्याच दिशेनं इशारा आहे का? याची चर्चा सुरु होणारच. कारण ते बोलले अपयश आणि जबाबदारीबद्दल. पाच राज्याच्या निकालानंतर हे सगळं त्यांच्याच पक्षाला, पक्षनेतृत्वाला लागू होतं. पण या विधानाची खमंग चर्चा सुरु झाल्यानंतर 'मीडियानं आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला' म्हणून गडकरींचं तातडीचं स्पष्टीकरण आलं.

या स्पष्टीकरणाला चार दिवसही होत नाहीत तोवर कालच दिल्लीतल्या एका कार्यक्रमात गडकरींनी पुन्हा नेतृत्व आणि जबाबदारीसंदर्भात नवं विधान केलं. "जर मी अध्यक्ष असेल आणि माझे आमदार-खासदार योग्य कामगिरी करत नसतील तर त्याला जबाबदार कोण? मीच", असं दिल्लीतल्या नेहरु मेमोरियल मध्ये इंटेलिजिन्स ब्युरोच्या वार्षिक व्याख्यानमालेत बोलताना गडकरी म्हणाले. याच कार्यक्रमात बोलताना गडकरींनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची स्तुती केली. 'केवळ तुम्ही चांगले वक्ते आहात म्हणून निवडणुका जिंकू शकत नाही', या विधानाचाही दाखला दिला. गंमत म्हणजे कार्यक्रम आयबी या गुप्तचर यंत्रणेचा असताना नॅशनल सिक्युरिटीवर मात्र ते बोलले नाहीत.

गेले काही दिवस देश एकच 'मन की बात' ऐकत असताना आता गडकरी आपली मन की बात अशा व्यासपीठांमधून ऐकवत आहेत का? अशीही कुजबूज त्यामुळे दिल्लीत सुरु झाली आहे. मोदी सरकारमधले सर्वात वजनदार मंत्री अशी गडकरींची ख्याती आहे. ते भाजपचे माजी अध्यक्षही आहेत. शिवाय संघाचे 'मोस्ट फेवरेट मॅन' अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळे गडकरी फक्त माध्यम असून हा संघाचा शाहांना मेसेज आहे का? असाही तर्क लावला जात आहे.

राजकारणात गोष्टी चाचपून पाहण्याची, मेसेज देण्याची एक वेगळी पद्धत असते. त्यामुळे अनेकदा आपल्याला नेत्यांच्या ज्या नकारार्थी माना डुलताना दिसतात, त्यातही बरेच अर्थ दडलेले असतात. प्रत्येक विधानामागे गडकरींचं लांबलचक स्पष्टीकरण येत असलं तरी या सगळ्या वक्तव्यांचं टायमिंग, त्यातली जबाबदारीची भाषा बघता हा इशारा कुणाला आहे हे वेगळं सांगायला नको. सध्याच्या बदललेल्या भाजपमध्ये नेतृत्वाला असं इशारा देणं सोपं नाही. अनेकांच्या मनात असलं तरी हिंमत मात्र गडकरीच करु शकतात कारण गडकरींचं नागपूर कनेक्शन मजबूत आहे. त्यामुळे आता गडकरींच्या या विधानांचे पडसाद पक्षसंघटनेत कसे प्रतिबिंबित होणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.