नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री यशंवत सिन्हा यांच्या आरोपानंतर, त्यांचे पुत्र आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा मोदी सरकारच्या पाठिशी उभे राहिले आहेत.


जयंत सिन्हा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेल्या लेखात देशाची अर्थव्यवस्था पारदर्शक झाल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर मोदी सरकारनं अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उपाय केल्याचा दावा जयंत सिन्हा यांनी केला आहे.

नवी अर्थव्यवस्था ही नव्या भारतासाठी आहे. रोजगार निर्मिती, कुशल कामगार, जागतिक बाजारपेठेत भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी अर्थव्यवस्थेत बदल आवश्यक होते, असं जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर येत्या काळात देशातील नागरिकांना याचा फायदाच होणार असल्याचं जयंत सिन्हा म्हणाले. जीएसटी, नोटाबंदी आणि डिजीटल पेंमेटमुळं देशाची अर्थव्यवस्था बळकट होत आहे, असा विश्वासही जयंत सिन्हांनी व्यक्त केला आहे.

यशवंत सिन्हा काय म्हणाले होते?

दरम्यान काल इंडियन एक्स्प्रेसच्या अग्रलेखातून यशवंत सिन्हा यांनी नोटबंदीवरुन भाजपवर जोरदार टीका केली. होती मंदीच्या काळात नोटबंदी म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखं असल्याचा घणाघात भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी केला होता.

नोटबंदीनंतर पहिल्या तिमाहीत विकास दर घटून 5.7 टक्क्यांवर गेला आहे. जो गेल्या 3 वर्षातील सर्वात निचांकी आहे. त्याचसोबत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्यानं भडकत आहेत. भरीस भर म्हणून जीएसटीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचं वातावरण आहे, असं यशवंत सिन्हा म्हणाले होते.

सामनातून टीकास्त्र

दरम्यान आज शिवसेनेने सामना या मुखपत्रातून यशंवत सिन्हांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला. आम्हाला काहीच म्हणायचे नाही. हे सर्व आम्ही वर्षभरापूर्वीच सांगितले होते. तेव्हा आम्ही देशद्रोही ठरलो होतो. आता यशवंत सिन्हा ठरतील! असं ‘सामना’त म्हटलं आहे. त्याचबरोबर देशभरातील ‘विकास’ वेडा झाल्याचं राहुल गांधींचं वक्तव्य शहाणपणाचं असल्याची कोपरखळीही सामनातून मारण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

मंदीत नोटाबंदी म्हणजे आगीत तेल : यशवंत सिन्हा

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचं जगाने मान्य केलंय : राजनाथ सिंह

'अब की बार, मंदी लाई सरकार', असं का म्हटलं जातंय?