तिरुअनंतपूरम: भारताचे 'मेट्रो मॅन' म्हणून प्रसिध्द असलेले 88 वर्षीय ई. श्रीधरन आता सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे. केरळमध्ये भाजपची 21 फेब्रुवारीपासून विजय यात्रा सुरुवात होणार असून ई. श्रीधरन हे त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यात भाजपचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलंय.


ई. श्रीधरन यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्यांनी आता भाजपच्या विचारधारेशी सुसंगत अशी मतं व्यक्त करण्याचा धडाका लावलाय. ई. श्रीधरन यांच्या या वेगवेगळ्या मतांवरुन ते आता ट्विटरवर ट्रेन्ड होताना दिसत आहेत.





केरळमध्ये भाजपची सत्ता आली तर मी मुख्यमंत्री होईन असे वक्तव्य त्यांनी केलंय. तसेच त्यांनी 'लव जिहाद' ही संकल्पना धोकादायक असल्याचं सांगत त्याला आळा घातला पाहिजे असंही मत व्यक्त केलंय. केरळमध्ये लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदू आणि ख्रिश्चन धर्मातील मुलींना फसवलं जातं आणि त्यांचं धर्मांतर करण्यात येत असल्याचं ई. श्रीधरन यांनी सांगितलं. ई. श्रीधरन यांनी मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशने लव्ह जिहाद विरोधात केलेल्या कायद्याचे समर्थन केलंय.


भारताला बुलेट ट्रेनची नाही, आधुनिक, सुरक्षित रेल्वेची गरज : श्रीधरन


स्वत: शुद्ध शाकाहारी असल्याचं सांगत राज्यात कोणी बीफ खाल्लेलं मला आवडणार नाही असंही मत ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलंय. त्यांनी केरळमध्ये बीफ बॅन व्हावं अशीही मागणी केलीय.


मोदींच्या प्रत्येक गोष्टींना विरोध करण्याची देशात फॅशन आल्याचं सांगत त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर टीका केलीय. शेतकऱ्यांना खरा मुद्दा समजला नसेल किंवा ते यातले राजकीय कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत असं मत ई. श्रीधरन यांनी व्यक्त केलंय.


मोदींच्या कार्यकालात देशात कोणतीही असहिष्णूता वाढली नसल्याचं मत त्यांनी व्यक्त करत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. भाजप कोणताही धार्मिक पक्ष नसल्याचंही त्यांनी मत व्यक्त केलंय.


कांजुरमार्गमधील मेट्रो कारशेडमुळे राज्याचे 1 हजार 580 कोटी रुपये वाचणार, 9 सदस्यीय समितीचा अहवाल