Manipur Violence : नवी दिल्ली : एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल रशिया दौरा करणार आहेत. मात्र, दुसरीकडे देशातील मणिपूर (Manipur) राज्य अजूनही धुमसत आहे. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलनात पोलिसांसोबतच्या झटापटीत 40 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मणिपूर सरकारकडून 5 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. तर तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 12 सप्टेंबरपर्यंत मणिपूरमधील सर्व सरकारी आणि खासगी महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत.                       

  


संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान, राज्य सरकारनं संपूर्ण राज्यात इंटरनेटवर तात्पुरती बंदी घातली आहे. शांतता राखण्यासाठी राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये कर्फ्यु जारी करण्यात आला आहे.            


मणिपूर सरकारच्या गृह विभागानं मंगळवारी दुपारी 3 वाजल्यापासून राज्यात 'लीज लाईन्स, व्हीएसएटी, ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाईल डेटा सेवा तात्पुरती निलंबित' करण्याचा आदेश जारी केला आहे.                              


सर्व शाळा, कॉलेज बंद 


मणिपूरचे तीन जिल्हे इंफाळ पूर्व आणि इंफाळ पश्चिममध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. तर, BNSS च्या कलम 163 (2) अंतर्गत थौबलमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. मणिपूरमधील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालये 11 आणि 12 सप्टेंबर रोजी बंद राहतील, असं शिक्षण अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे.


पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या


मणिपूरमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती बिकट झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरएएफला दंगल नियंत्रण वाहनांसह पाचारण करण्यात आलं आहे. आंदोलकांनी रास्ता रोको केल्यानं पोलिसांना मागे हटण्यास भाग पाडलं. सातत्यानं दगडफेक सुरू आहे. जमावाला पांगवण्यासाठी दुसऱ्या बाजूनं पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. 


वर्षभराहून अधिक काळापासून धुमसणारं मणिपूर


सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मणिपूरमध्ये हिंसेचा तोच प्रकार पाहायला मिळत आहे जो, 2023 मध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दिसला होता. ड्रोनद्वारे हवाई बॉम्बहल्ला करण्यापासून ते आरपीजी प्रक्षेपित करणं आणि आधुनिक शस्त्रांचा वापर यामुळे परिस्थिती संवेदनशील बनली आहे. खोऱ्यातील हत्याकांडानंतर समन्वय समितीनं 'सार्वजनिक आणीबाणी' जाहीर केली आहे.