Madhu Limaye : बिहारमध्ये राजकीय भूकंप करत मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा दिला. भाजपला धक्का देत नितीश कुमारांनी एनडीएमधून (NDA) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाशी युती करत त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. बुधवारी नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर त्यांच्यासोबत तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे राजकारण नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असते. याच बिहारमध्ये एकेकाळी मधू लिमये नावाच्या मराठी नेत्याने सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. विशेष म्हणजे लिमये चार वेळा जनतेतून खासदार म्हणून निवडून आले होते. मधू लिमये हे पुण्यातील हिंगणे येथील होते. परंतु, त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र बिहार होते. 


मधू लिमये हे मूळचे पुण्याचे होते. परंतु, ते चारवेळा बिहारमधून खासदार झाले. असं म्हटलं जातं की, बिहारच्या राजकीय इतिहासाबद्दल ज्या-ज्या वेळी बोललं जातं, त्या-त्या वेळी मधू लिमये या मराठी नेत्याचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. लिमये यांच्याशिवाय बिहारचा राजकीय इतिहास पूर्णच होत नाही. 


मधू लिमये यांचे संसदीय जीवन हे संघर्ष, साहस आणि कार्यकर्तृत्वाचे उदाहरण आहे. त्यांचे नाव त्या मोजक्या खासदारांपैकी एक आहे, ज्यांची भीती सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. मधू लिमये कागदांचा गठ्ठा घेऊन संसदेत प्रवेश करत असत, तेव्हा सत्ताधारी सदस्यांना घाम फुटत असे. त्यावेळी समाजवादी पक्षाच्या काही खासदारांनी काँग्रेसच्या प्रचंड बहुमताच्या सरकारला घाम फोडला होता.  


मधू लिमये यांनी वयाच्या 14-15 व्या वर्षी संघर्षमय जीवनाला सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळीत ते तुरुंगात गेले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर त्यांची सुटका झाली. गोवा सत्याग्रहात मधू लिमये यांना 12 वर्षांची शिक्षा झाली होती. एवढेच नाही तर पोर्तुगीजांनी लिमये यांना तुरुंगात खूप छळले होते.


मधू लिमये हे 1958 ते 1959 पर्यंत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष, 1967-68 मध्ये संयुक्त समाजवादी पक्षाच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष आणि 1977-1979 पर्यंत जनता पक्षाचे सरचिटणीस होते. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांनी मंत्री होण्यास नकार दिला होता.


मधू लिमये 1964 च्या पोटनिवडणुकीत बिहारच्या मुंगेरमधून खासदार झाले. त्यानंतर त्यांनी 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीतही विजय मिळवला. मात्र, तिसऱ्यांदा मुंगेरमधून तिरंगी लढतीत त्यांचा पराभव झाला. यानंतर ते शेजारच्या बांका येथे निवडणूक लढवण्यासाठी गेले. बांका येथे त्यांनी 1973 आणि 1977 मध्ये सलग दोन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली.  


मधू लिमये यांचे नाव संसदेच्या अशा मोजक्या सदस्यांपैकी एक आहे, जे गंभीर चर्चेसाठी लक्षात राहतात. शरद यादव त्यांना चालती संसद म्हणतात. त्या काळातील पत्रकार आणि राजकारण्यांच्या मते त्यांच्याएवढी संसदीय पद्धतीची जाण कुणालाच नव्हती. संसदपटू आणि राजकारणी म्हणून त्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. 


सार्वजनिक जीवनात मधू लिमये साधेपणा आणि पावित्र्याचे इतके पुरस्कर्ते होते की त्यांना माजी खासदार म्हणून मिळणारी पेन्शनही नाकारली होती. एवढेच नाही तर मृत्यूनंतर पत्नीला पेन्शनचा एक रुपयाही घेऊ नको, असेही त्यांनी सांगितले होते. मधू लिमये यांचे वयाच्या 72 व्या वर्षी 8 जानेवारी 1995 रोजी नवी दिल्ली येथे निधन झाले.