नवी दिल्ली : देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी. देशांतर्गत विमान वाहतूक येत्या 25 मेपासून सुरु होणार आहे, अशी माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्यासाठी सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. प्रवाशांसाठी स्पेशल ऑपरेटिंग प्रोसिजर मंत्रालयाने जारी केली आहे.





देशभरात येत्या 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या दरम्यान देशांर्गत हवाई वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्वीट करुन सांगितलं की, 25 मे पासून देशांर्तग हवाई वाहतूक सुरु केली जाणार आहे. सर्व विमानतळांना 25 मे पासून सेवा देण्यास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


विशेष रेल्वेनंतर आता एअर इंडियाची देशांतर्गत विशेष विमान सेवा! मंगळवार, 19 मे पासून?


यापूर्वी 15 मे रोजी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) प्रवाशांसाठी काही गाईडलाईन जारी केल्या होत्या. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने सहा सूचना केल्या होत्या. ज्यामध्ये 'आरोग्य सेतू' अॅप डाऊनलोड करणे, वेब-चेकइन करणे आणि बोर्डिंग पास प्रिंट आउट आणणे बंधनकारक आहे.