नवी दिल्ली : आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील कारवाईनंतर नितीश कुमार सरकार अडचणीत आलं आहे. सीबीआयच्या छापेमारीनंतर भाजपकडून त्यांच्या दोन्ही मुलांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे.


मोदी सरकार आकसापोटी कारवाई करत असून आपण कोणताही घोटाळा केलेला नाही, असं स्पष्टीकरण लालू प्रसाद यादव यांनी दिलं आहे. मात्र बिहारमध्ये विरोधी पक्षात असलेल्या भाजपने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारला धारेवर धरलं आहे.

लालू प्रसाद यादव यांचे छोटे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि मोठे चिरंजीव असलेले आरोग्यमंत्री तेजप्रताप सिंह यांच्यावर भाजपने हल्लाबोल सुरु केला आहे. नितीश कुमार सरकारवर भाजपकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या मुलांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं, तर आरजेडी पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. परिणामी नितीश कुमार सरकार अल्पमतात येईल.

बिहार विधानसभेचं गणित

बिहार विधानसभेत एकूण 243 सदस्य आहेत. बहुमतासाठी 122 आमदारांची गरज आहे. आरजेडीचे 80, जेडीयूचे 71, काँग्रेस 27, भाजप 58, सीपीआय 3 आणि 4 अपक्ष आमदार आहेत.

सध्या बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू आणि काँग्रेसचं सरकार आहे. ज्यांचे एकूण 178 आमदार आहेत. जे बहुमतापेक्षाही 56 अधिक आहेत. लालू प्रसाद यादव यांनी जेडीयूची साथ सोडल्यानंतर काँग्रेसने पाठिंबा दिला तरीही 98 आमदार उरतात. म्हणजे बहुमतासाठी आणखी 24 आमदारांची गरज आहे.

नितीश कुमार यांना सरकार बहुमतात ठेवायचं असेल तर, जुने मित्र पक्ष एनडीएकडे यावं लागेल, ज्यामध्ये त्यांना भाजपचा पाठिंबा मिळेल. नितीश कुमार एनडीएकडे आल्यास आकडा 129 एवढा होतो, जो बहुमतापेक्षा जास्त आहे.