Lakhimpur Case Update :  उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा फोर्स (BSF)चे जवाव तेज बहादूर यादव यांनी आपले वकील प्रदीप कुमार यादव यांच्यातवतीने या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी याचिका दाखल केली आहे. 


तेज बहादूर यादव यांनी दाखल केलेल्या याचिकेत केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे  उपमुख्यमत्री केशव मौर्य यांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 


काय घडलं होतं लखीमपूर येथे?
उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खेरी येथील टिकुनिया येथे 3 ऑक्टोबर रोजी एका कार्यक्रमात कृषी कायद्यांचा निषेध करुन परतत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी उपस्थित होते. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. या घटनेत स्थानिक पत्रकार रमन कश्यप यांचाही मृत्यू झाला होता. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची पहिली सुनावणी 8 ऑक्टोबर रोजी झाली. त्यानंतर आशिष मिश्रा उर्फ ​​मोनू याला अनेक तासांच्या चौकशीनंतर 9 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. 


दरम्यान, लखीमपूर खेरी येथील घटना हा सुनियोजित कट होता, असे एसआयटीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एसआयटीने आता आरोपींवर लावण्यात आलेल्या कलमांमध्येही बदल केला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आता हत्येचा खटला चालणार आहे. 


लखीमपूर घटनेतील मुख्य आरोपी आशिष मिश्रासह 14 जणांवरील चौकशीनंतर कलमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सर्व आरोपींवर जाणीवपूर्वक नियोजन करुन गुन्हा केल्याचा आरोप आहे. SIT ने भांदवि (IPC) कलम 279, 338, 304A काढून 307, 326, 302, 34,120 B, 147, 148,149, 3/25/30 या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 


महत्वाच्या बातम्या