जबलपूर : तुम्हाला शाळेत वाचलेली वाल्या कोळ्याची गोष्ट आठवतेय का? वाल्या कोळी हा जंगलात दरोडेखोर असतो.. तो येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटून त्यांची हत्याही करत असे. प्रत्येक लूट किंवा हत्या केल्यावर त्याच्या घरातील रांजणात तो एक खडा टाकायचा. असे अनेक रांजण त्याने भरले. एक दिवस एक सत्पुरूष जंगलातून जाताना त्यांनाही लुटण्याचा त्याने प्रयत्न केला. मग त्यांनी विचारलं की तुझ्या पापात तुझे कुटुंबीय सहभागी आहेत का? वाल्या कोळ्याचं उत्तर अर्थातच होय असं होतं. त्यावर त्या सत्पुरूषांनी त्याला खरोखरच त्याच्या कुटुंबीयांना एकदा विचारण्याचा सल्ला दिला. वाल्या कोळ्याने जेव्हा घरी जाऊन आपल्या कुटुंबीयांना विचारलं तेव्हा त्याच्या पापात सहभागी होण्यास कुणीही तयार नव्हतं.


 

तुम्हाला माहिती असलेली ही गोष्ट पुन्हा सांगायचं कारण म्हणजे, जबलपूरमधील सीबीआयच्या विशेष कोर्टाने दिलेला एक महत्वपूर्ण निकाल. जबलपूर न्यायालयाने भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांला शिक्षा सुनावताना त्याचे कुटुंबीय म्हणजे पत्नी, मुलगा आणि सुनेलाही शिक्षा सुनावलीय. त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या कमाईवर त्याचे कुटुंबीय मजा करत होते, म्हणून त्याच्या गुन्ह्यात त्याचे कुटुंबीय समान भागीदार आहेत, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला.

 
सरकारी सेवेत लेखापाल (अकाऊंटंट) असलेल्या हा अधिकारी उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त कमाई असल्याच्या गुन्ह्यात अडकला होता. त्याच्या खटल्याची सुनावणी करताना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तो भ्रष्ट अधिकारी, त्याची पत्नी, मुलगा आणि सून यांना प्रत्येकी पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

 
सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश योगेश चंद्र गुप्ता यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यासह त्याच्या घरातील प्रत्येकाला अडीच लाख रूपयांच्या दंडाचीही शिक्षा सुनावलीय.

 
जबलपूर येथील सूर्य कांत गौर हे संरक्षण विभागाच्या लेखा खात्यात लेखापाल होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी भ्रष्ट मार्गाने जमवलेल्या रकमा आपली पत्नी, मुलगा आणि सुनेच्या खात्यात ट्रान्सफर केले होते.

 

सीबीआयचे वकील प्रतीश जैन यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.सीबीआयने 2010 मध्ये जेव्हा भ्रष्ट लेखापाल सूर्य कांत गौर यांच्या घरी छापा टाकला तेव्हा त्यांना या पैसे ट्रान्सफर केल्याच्या पावत्या मिळाल्या.

 

या कारवाईत फक्त सूर्यकांत गौर यांचा अवघ्या पाच वर्षांच्या नातवाला न्यायालयाने मोकळीक दिली. मात्र नंतर शिक्षा झालेल्या अन्य कुटुंबीयांनी वकिलामार्फत केलेल्या विनंतीवरून या पाच वर्षाच्या मुलालाही तुरूंगातच पाठवण्यात आलं. पाच वर्षाच्या नातवाला आपल्या आजोबांनी आणि वडिलांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. शाळेत जाण्याच्या वयात त्याच्यावर तुरूंगात जाण्याची वेळ आलीय.    ​