Kerala Boat Tragedy : केरळमधील (Kerala) मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी (7 मे) संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. सुरुवातीला बोट उलटली त्यावेळी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आणखी 15 जणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. शोधकार्य अजूनही सुरु आहे.


बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. लोकांचा शोध घेणं, जिवंत असलेल्यांना वाचवणं आणि जखमींना रुग्णालयात नेणं ही प्रक्रिया रात्रभर सुरु होती.


क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा बोटीतून प्रवास


ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम इथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणं नसल्याचंही बोललं जात आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


आरोग्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक 


या अपघातानंतर राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींवर तज्ज्ञांकडून तातडीने उपचार मिळावेत आणि शवविच्छेदन प्रक्रियाही जलद व्हावी, जेणेकरुन मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांच्या ताब्यात देता येतील, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तिरुर, थिरुंगडी, पेरिंथलमन्ना रुग्णालये आणि मंचेरी वैद्यकीय महाविद्यालयात थ्रिसूर आणि कोझिकोड सारख्या जिल्ह्यातील डॉक्टरांसह पुरेसे कर्मचारी आणून शवविच्छेदन केलं जाईल. मंत्र्यांनी सकाळी 6 वाजल्यापासून शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि शक्य असल्यास ते खाजगी रुग्णालयातही करावेत, असं निर्देशांमध्ये म्हटलं आहे.


पंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. यासोबतच त्यांनी ट्वीट करुन आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहे. प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची भरपाईल दिली जाईल.