नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत तिने न्यायालयाचं दारही ठोठावलं. जुही चावलाने भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही 5G विरोधातील याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली आहे. ही याचिका पब्लिसीटीसाठी असल्याचं सांगत जुही चावलाला कोर्टानं 20 लाखांचा दंड  ठोठावला आहे.


Juhi Chawla 5G Petition: 5G विरोधातील सुनावणीदरम्यान चाहत्यानं गायलं जुही चावलाच्या सिनेमातलं गाणं, न्यायमूर्ती संतापले!


कोर्टानं म्हटलं आहे की, फिर्यादीनी कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला. यामुळं फिर्यादीवर 20 लाख रुपयांचा दंड लावण्यात येत आहे. हे प्रसिद्धीसाठी होतं असंही दिसतंय.  जुही चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीचा लिंक प्रसारित केली, असं  कोर्टाने म्हटलं आहे. न्यायमूर्ती जे आर मिधा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, चावला यांनी सोशल मीडियावर सुनावणीची वेब लिंक प्रसारित केली. हे लक्षात घेता प्रसिद्धीसाठी हा दावा दाखल करण्यात आला आहे, असं त्यांनी म्हटलं.


मागील सुनावणीदरम्यान चक्क गायलं गाणं!


मागील सुनावणीच्या आधी जुही चावलांनी स्वत: ट्विट करुन लोकांना या सुनावणीत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सुनावणीदरम्यान एका फॅननं थेट जुही यांच्या चित्रपटातील गाणं गाण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे न्यायमूर्ती संतापले होते. त्यांनी थेट दिल्ली पोलिसांनी सांगून अशा लोकांना शोधून त्यांना नोटीस देऊ आणि त्यांच्यावर कंटेप्ट ऑफ कोर्टची कारवाई करु असा इशारा दिला होता. या सुनावणीच्या सुरुवातीपासूनच व्यत्यय येत होता. काही लोकं सुरुवातीला 'जुही मॅम कुठे आहेत? मला जूही मॅम दिसत नाहीत, असं विचारत होते. यानंतर एकाने जुही चावलाने अभिनय केलेल्या चित्रपटामधील गाणं गायला सुरुवात केली होती. यावर खटल्याची सुनावणी करणारे न्यायमूर्ती जे. आर. मिधा यांनी कोर्टाच्या कर्मचार्‍यांना संबंधित व्यक्तीला शांत करण्यास सांगितले होते. त्यांनी थेट दिल्ली पोलिसांनी सांगून अशा लोकांना शोधून त्यांना नोटीस देऊ आणि त्यांच्यावर कंटेप्ट ऑफ कोर्टची कारवाई करु असा इशारा दिला होता.


काय होती जुही चावलाची मागणी?


जुही चावलाने दाखल केलेल्या या याचिकेत मागणी केली होती की, "5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनावर बारकाईने विचार करुन त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी." जुही चावलाने आपल्या या याचिकेत भारताच्या दूरसंचार मंत्रालयाला आवाहन केलं आहे की, "5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा."


जुही चावलाने एबीपी न्यूजला सांगितलं होतं की, "आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याच्याविरोधात नाही. उलट यामधून निर्माण होणाऱ्या नवनव्या उत्पादनांचा आपण लाभही घेतो, ज्यात वायरलेस कम्युनिकेशनचाही समावेश आहे. परंतु या उपकरणांच्या वापराबाबत आपण आजही गोंधळाच्या स्थितीत आहोत. कारण वायरफ्री गॅजेट्स आणि नेटवर्क सेल टॉवर्सशी संबंधित आपल्याच संशोधनातून हे स्पष्ट होतं की अशाप्रकारचे रेडिएशन नागरिकांच्या आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय हानीकारक आहेत.


"भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी RF रेडिएशनमुळे महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुलं, बालकं, जनावरं, जीव-जंतू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा योग्यरित्या संशोधन केलं जावं. झालेल्या किंवा होणाऱ्या संशोधनाचा अहवाल सार्वजनिक केला जावा. "5G टेक्नॉलॉजी भारताच्या सध्याच्या नागरिकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित आहे की नाही हे या संशोधनानंतर स्पष्ट केलं जावं. त्यानंतच ही टेक्नॉलॉजी लागू करण्याबाबत विचार करावा," असं जुही चावलच्या एका प्रवक्त्याने अधिकृत वक्तव्यात स्पष्ट केलं होतं.