नवी दिल्ली : फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा फेक न्यूज दिल्यास पत्रकाराची अधिस्वीकृती कायमस्वरुपी रद्द होणार आहे.


पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरुपी अधिस्वीकृतीच रद्द करण्यात येणार आहे. फेक बातम्यांच्या वाढता आलेख पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

माहिती आणि प्रसारण विभागातील मार्गदर्शक तत्त्वांमध्येही तसा बदल करण्यात आला आहे. मात्र 'फेक न्यूज'ची नेमकी व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही.

प्रिंट मीडियातील फेक न्यूजबाबत पीसीआय (प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया), तर टीव्हीवरील फेक न्यूजबाबत एनबीए (नॅशनल ब्रॉडकास्टर्स असोसिएशन) कडे तक्रार करण्यात येईल. मात्र डिजिटल मीडियाबाबत यामध्ये कोणताही उल्लेख नाही.

फेक न्यूजसंबंधी चर्चेसाठी आज संध्याकाळी चार वाजता 'प्रेस क्लब ऑफ इंडिया'मध्ये पत्रकारांची तात्काळ बैठक बोलावण्यात आली आहे.