मुंबई : अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांनी तामिळनाडूत इतिहास रचला आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांना सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळालं आहे. जयललितांनी करुणानिधी यांच्या द्रमुकचा पराभव केला.


 

 

एकेकाळी अभिनेत्री असलेल्या जयललिता यांची आता देशातील प्रभावशाली महिलांमध्ये गणना होते. तामिळनाडूमध्ये जयललिता यांना अम्मा म्हटलं जात असलं तरी त्यांना 'आयर्न लेडी' म्हणूनही ओळखलं जातं. याचं कारण म्हणजे त्यांची महत्त्वकांक्षा आणि कठोर निर्णय घेण्याची त्यांची हिंमत. तामीळ राजकारण हे जयललिता यांच्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. पण देशाच्या राजकारणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

 

कार्यकर्त्यांचं श्रद्धास्थान

 

 

अम्मा नावाने प्रसिद्ध असलेल्या जयललिता यांना टीका केलेली आवडत नाही. त्याचे कार्यकर्ते तसंच समर्थक त्यांना देवाच्या जागी मानतात. त्यांची पुजा करतात आणि जयललितांनाही अशा श्रद्धेचं वावडं नाही.

 

 

एक सुंदर अभिनेत्री ते आयर्न लेडीपर्यंतचा प्रवास जयललिता यांच्यासाठी सोपा नव्हता. या काळात त्यांनी जीवे मारण्यासाठी रचलेला कट पाहिला, मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्याचे डावपेच पाहिले. भ्रष्टाचाराचे आरोप पाहिले. पण हे आरोप आता पुस्तकातील गोष्टी बनून राहिले आहेत. पण जयललिता या सगळ्यातून सावरल्या. फक्त सावरल्याच नाही तर त्याचा सामना करुन यशस्वीही झाल्या.

 

 

कर्नाटकच्या मेलुरकोटमध्ये जन्म

 

 

जयललिता यांचा जन्म एका तामीळ कुटुंबात 24 फेब्रुवारी, 1948 रोजी कर्नाटकच्या मेलुरकोट गावात झाला. म्हैसूरमध्ये संध्या आणि जयरामन या ब्राह्मण दाम्पत्याची मुलगी जयललिता यांचं शिक्षण चर्च पार्क कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं.

 

 

जयललिता दोन वर्षांची असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर आई जयललितांना घेऊन बंगळुरुला गेली. तिथे आईने तामीळ सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली. जयललिता यांचं शालेय शिक्षण सुरु असतानाच आईने त्यांना सिनेमात काम करण्यासाठी तयार केलं. इंग्लिश भाषेत असलेला 'एपिसल' हा त्यांचा पहिला सिनेमा होता.

 

 

कन्नड सिनेमात अभिनय

 

 

15 वर्षांच्या वयात त्यांनी कन्नड सिनेमात अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे जयललिता त्या जमान्यातील पहिली अभिनेत्री होत्या ज्यांनी मोठ्या स्क्रीनवर पहिल्यांदा स्कर्ट परिधान केला होता. त्यावेळी ही बाब फारच मोठी होती.

 

 

त्या काळातील सर्वात प्रसिद्ध अभिनेते एम जी रामचंद्रन यांच्यासोबतची जयललितांची जोडी फारच लोकप्रिय झाली. 1965 ते 1972 या काळात त्यांनी अनेक चित्रपट एम जी रामचंद्रन यांच्यासोबत केले. सिनेक्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीत त्यांनी 300 हून अधिक तामीळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदी सिनेमात काम केलं.

 

 

पडद्यावरचे जोडीदारच राजकीय गुरु

 

 

पदड्यावरचे जोडीदार एम जी रामचंद्रन हेच त्यांचे राजकीय गुरु होते. एमजीआर म्हणून प्रसिद्धे असललेल्या एम जी रामचंद्रन यांच्यासोबतच त्यांची दुसरी इनिंग राजकारणात सुरु झाली. एम जी रामचंद्रन यांनी राजकारणात प्रवेश केला तेव्हा सुमारे दहा वर्षांपर्यंत जयललितांसोबत त्यांचा काहीही संपर्क नव्हता. पण 1982 मध्ये रामचंद्रन जयललितांना राजकारणात घेऊन आले. मात्र जयललिता यांनी या गोष्टीचा नेहमीच इन्कार केला. इंग्लिश भाषा चांगली असल्याने जयललिता यांनी राज्यसभेत जावं अशी रामचंद्रन यांची इच्छा होती. जयललिता 1984-1989 पर्यंत राज्यसभेच्या सदस्य होत्या. शिवाय त्यांची पक्षाच्या प्रचार सचिवपदी नियुक्तीही करण्यात आली होती.

 

 

अण्णा द्रमुकचे दोन भाग

 

परंतु 1987 मध्ये रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर अन्ना द्रमुकचे दोन भाग झाले. एमजीआर यांची विधवा जानकी रामचंद्रन यांनी एका भागाचं नेतृत्त्व केलं तर जयललिता यांनी दुसऱ्या भागाचं. जयललिता रामचंद्रन यांच्या अतिशय जवळच्या मानल्या जात असत. त्यामुळे त्यांनी स्वत:ला रामचंद्रन यांची उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं.

 

 

मुख्यमंत्री बनण्याची शपथ

 

जयललिता समर्थकांचा आरोप होता की, 1989 मध्ये डीएमकेच्या एका मंत्र्याने विधानसभेत त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं होतं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री बनण्याची शपथ घेतली. या गोंधळानंतर करुणानिधी हे जयललितांच्या कायम निशाण्यावर राहिले.

 

 

सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री

 

1991 मध्ये त्या पहिल्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. जयललिता या तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्याच शिवाय तामिळनाडूच्या सर्वात कमी वयाच्या मुख्यमंत्री होण्याचा मानही त्यांनाच मिळाला.

 

 

कठोर शासनासाठीही जयललिता कायम चर्चेत राहिल्या. 2001 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारल्यानंतर जयललिता यांनी एकाच वेळी तब्बल दोन लाख कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याने खळबळ माजली होती.

 
जेलची हवा

 

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी बंगळुरुच्या विशेष न्यायालयानं जयललिता यांना 4 वर्षाची शिक्षा आणि 100 कोटीचा दंड ठोठावला होता. त्यामुळे त्यांची रवानगी जेलमध्ये झाली होती.

 

 

विशेष न्यायालयाच्या निर्णयामुळे जयललिता यांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावं लागलं होतं. विशेष न्यायालयाच्या निकालाला जयललिता यांनी हायकोर्टात आव्हान दिलं. 18 वर्षापासून सुरु असलेल्या या प्रकरणाची गेल्या वर्षी मे महिन्यात कर्नाटक हायकोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी हायकोर्टाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत, त्यांना दोषमुक्त केलं.

 

संबंधित बातम्या

जयललिता यांना मोठा दिलासा, हायकोर्टाकडून दोषमुक्त, पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा 

जयललितांच्या चाहत्याने स्वत:ला येशूप्रमाणे हातात खिळे ठोकून क्रॉसवर लटकवलं

जयललितांचा उल्लेख 'दोषी' असा केल्याने सभागृहातून आमदारांचं निलंबन

जयललितांना 10 वर्षे निवडणूक लढवता योणार नाही!

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना जामीन मंजूर 

जयललितांना शिक्षा झाल्याने तामिळनाडूत 16 जणांचा मृत्यू  

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना ओ. पनीरसेल्वम ढसासढसा रडले  

जयललिता...कैदी नंबर 7402, मु.पो. बंगलोर कारागृह!

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना चार वर्षाचा कारावास, जयललितांनी मुख्यमंत्रीपद गमावलं