हैदराबाद: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज श्रीहरीकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन शंभरावा उपग्रह अंतराळात सोडला. सकाळी 9.29 वा पीएसएलव्ही सी 40/कार्टोसॅट 2 मिशनचं प्रक्षेपण झालं.


पीएसएलव्ही सी 40 सोबत भारत तब्बल 31 उपग्रह सोडण्यात आले. यामध्ये 3 भारताचे तर 28 उपग्रह हे अन्य 6 देशांचे आहेत. यामध्ये फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे.

भारतासाठी आजची मोहीम ऐतिहासिक होती. कारण गेल्या वर्षी इस्रोचं पीएसएलव्ही सी 39 हे मिशन अपयशी ठरलं होतं. त्यानंतर इस्रोने पुन्हा जोमाने तयारी करुन, पीएसएलव्ही सी 40 हा प्रक्षेपक हवेत झेपावण्यास सज्ज केलं होतं.

यापूर्वी भारताने तब्बल 104 उपग्रह एकाचवेळी सोडून विश्वविक्रम केला होता.

एखादा प्रक्षेपक/रॉकेट अपयशी ठरल्यानंतर, त्याची डागडुजी करुन तो उड्डाणासाठी पुन्हा तयार करणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही. हे भारताचं ‘वर्कहॉर्स रॉकेट आहे’.

कार्टोसॅट 2

दरम्यान, भारत स्वत:चा एक मायक्रो आणि एक नॅनो उपग्रह सोडला. याशिवाय भारताचा सर्वात मोठा उपग्रह आहे तो म्हणजे कार्टोसॅट 2 सीरिज उपग्रह.

कार्टोसॅट 2 हा उपग्रह म्हणजे भारताचा ‘आकाशातील डोळा’ म्हणून ओळखला जात आहे.

आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं काम करणार आहे.

हा उपग्रह पृथ्वीची अवलोकन करणारी उच्च दर्जाची छायाचित्र पाठवणार आहे.