Indian Culture : भारत हा देश विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला आहे. भारतात विविध सण गुण्या गोविंदाने साजरे केले जातात. येथे विविधतेत एकता पाहायला मिळते. आणि हेच भारताचे वैशिष्ट्य आहे की, येथे जात-पात, लिंग, धर्म अशा कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही. अशाच काही संस्कृती आणि परंपरांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. 


1. नमस्कार : 


नमस्कार हा भारतीय परंपरेतला सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग आहे. भारतात आलेल्या प्रत्येकाचे, किंवा घरी आलेल्या पाहुण्याचे स्वागत नमस्कार करूनच केले जाते. नमस्काराचा अर्थ हा हिंदू धर्मग्रंथ, वेदांतात नमूद केल्याप्रमाणे अभिवादन करणे असा आहे. एक प्रकारे आदरार्थी असणारी ही कृती समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम, कृतज्ञता नक्कीच दर्शविते. 


2. भारतीय सण : 


भारतीय सण हे भारताची एकता दर्शवितात. भारतात दिवाळी असो, गणपती, ईद, नाताळ, पोंगल, होळी आदी..यांसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. या प्रत्येक सणाच्या मागे एक धार्मिक महत्त्व आहे. भारतीय सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सण साजरे करत असताना नातेवाईक, मित्र-मंडळी एकत्र येतात आणि मोठ्या आनंदात, उत्साहात सण साजरा करतात. विशेष म्हणजे महत्वाच्या सणांच्या दिवशी शासनातर्फे सुट्टीही जाहीर करण्यात येते. 


3. एकत्र कुटुंबपद्धती : 


भारताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी अजूनही एकत्र कुटुंब पद्धत पाहायला मिळते. जिथे आजी-आजोबा, आई-बाबा, मुलगा-मुलगी, काका-काकी हे सगळे एकत्र राहतात. यामुळे विचारांची देवाणघेवाण तर होतेच. मात्र, कठीण प्रसंगी सुद्धा आपली माणसं आपल्या बरोबर असल्याची भावना निर्माण होते. पाश्चात्य देशात एकल कुटुंब पद्धत आहे त्यामुळे मुलांना कुटुंबाचे महत्त्व पटवून देणे थोडे कठीण होऊन जाते. 


4. व्रतवैकल्ये आणि उपवास : 


भारतात अधिकतर लोक हिंदू धर्मीय आहेत. हिंदू धर्म म्हटला की अनेक सण-समारंभ, व्रतवैकल्य आलेचय या निमित्ताने गृहिणी देवाच्या श्रद्धेपोटी उपवास धरतात. कडक व्रत पाळतात. देव-देवतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. नुकताच श्रावण महिना सुरु झाला आहे. या निमित्ताने अनेक हिंदू धर्मीय बांधवांनी उपवास ठेवले आहेत. 


5. मंदिरांमागील कलाकृती :


भारतात हिंदू धर्मीय लोक जास्त असल्या कारणाने या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळं आलीच. या धार्मिक स्थळांना एक प्रकारचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. भारतातील शिव मंदिर, हनुमान मंदिर, गणपती मंदिर. या मंदिरांची वास्तू, त्यातली कलाकुसर, रंगसंगती ही त्या काळची सामाजिक परिस्थितीचे वर्णन दर्शविते. 


6. विवाहसंस्था : 


भारतात विवाह संस्कृतीची संकल्पना वैदिक काळापासून सुरु झालेली आहे. भारतात विवाहसंस्थेला अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण विवाह म्हणजे दोन जीवांचं मिलन नसून या निमित्ताने दोन कुटुंब एकमेकांशी कायमचे जोडले जातात. भविष्याची वचनं पती-पत्नी एकमेकांना देतात. 


7. अतिथी देवो भव: 


भारतात आणखी एक प्रथा आहे जी कायम जपली जाते ती म्हणजे अतिथी देवो भव:. घरी आलेला पाहुणा हा देवाच्या रूपाने आला आहे असे मानून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे आनंदाने स्वागत केले जाते. 


8. भारतीय अन्न : पाककृती : 


भारतीय अन्नाला एक विशिष्ट प्रकारचा गोडवा आहे. त्यामध्ये माया, ममता, आणि ऊब आहे. भारतीय अन्नात तिखट, गोड, आंबट, खारट, तुरट अशा सर्वच पदार्थांचा समावेश असतो. या अन्नामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच पाचन शक्तीही सुधारते. तसेच भारतातील प्रत्येक पदार्थ बनविण्यामागे त्याचे शास्त्रोक्त कारण आहे. त्यामुळे त्या पदार्थाचं महत्त्व अधकिच पटतं. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे भारतात हाताची पाचही बोटं अन्नात मिसळून अन्न खाण्याची प्रथा आहे. ज्यामुळे याचे अनेक फायदे मिळतात.