India Weather Update : देशाच्या राजधानीसह उत्तर भारतात आता थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसत आहे. सुर्यप्रकाश पडत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळत आहे. दरम्यान, अनेक राज्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने  (IMD) वर्तवला आहे. तसेच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. पावसाचा अंदाज असणाऱ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्याचा समावेश आहे. तर हिमाचलमध्ये पुन्हा एकदा पावसासह बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात थंडी कमी झाल्याने उन्हाचा चटका वाढत आहे. दरम्यान, विदर्भात आज ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.



महाराष्ट्र


राज्यातील थंडीचा पारा कमी झाला आहे. राज्यात तापामानात वाढ होत असल्याने नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, आज विदर्भात हवामान ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  


दिल्ली


राजधानी दिल्लीत सध्या लोक सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहेत. आजही दिल्लीत कमाल तापमान 25 आणि किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळी थोडेसे धुके पडण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. परंतू, दिवसाच्या शेवटी हवामान स्वच्छ होईल. पुढील काही दिवस दिल्लीत असेच वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


उत्तर प्रदेश


उत्तर प्रदेशातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 27 अंश तर किमान तापमान 12 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण राहणार आहे.


बिहार


बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील. पाटणासह अनेक शहरांचे कमाल तापमान 26 अंश आहे तर किमान तापमान 13 अंश राहण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी 20 फेब्रुवारीला अनेक भागात पाऊस पडू शकतो. हवामान दिलेल्या माहितीनुसार, राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडेल. यानंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.


राजस्थान


राजस्थानमध्ये लख्ख सूर्यप्रकाश आणि थंडीपासून दिलासा मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हवामानात बदल झाला आहे. आज राज्याच्या जयपूर आणि जोधपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ आकाश असेल. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 28 अंश, तर किमान तापमान 12 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 फेब्रुवारी रोजी राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडू शकतो असेही हवामान विभागाने सांगितले आहे.


पंजाब


पंजाबमध्ये हवामान स्वच्छ राहण्यास सुरुवात झाली आहे. दिवसा सूर्यप्रकाशामुळे थंडीही कमी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता पुढील काही दिवस असेच हवामान राहणार आहे. दुसरीकडे, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, 19 फेब्रुवारी रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहील. आज कमाल तापमान 23 अंश तर किमान तापमान 7 अंश राहण्याचा अंदाज आहे.


जम्मू आणि काश्मीर


जम्मू-काश्मीरच्या काश्मीर विभागात आजही पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. जम्मू विभागातही आजपासून ढगाळ वातावरण राहील आणि कमाल तापमान 11 अंश आणि किमान तापमान -1 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या तीन ते चार दिवसांत अनेक भागांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 


उत्तराखंड


गेल्या मंगळवारी उत्तराखंडमधील उंच भागात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर अनेक भागात पावसाचीही नोंद झाली.  हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 22 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 8 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर येत्या तीन ते चार दिवसात पुन्हा एकदा पाऊस पडू शकतो.


महत्त्वाच्या बातम्या: