India Coronavirus Cases Update: गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (Covid-19) आकडेवारीत झपाट्यानं वाढ होत आहे. देशात सातत्याने कोरोनाची (Corona Virus) 10 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद केली जात होती. अशातच आता दोन दिवसांपासून मात्र कोरोना रुग्णांच्या संख्येत (Coronavirus Updates) घट होताना दिसत आहे. देशात सोमवारी कोरोनाच्या 9  हजार 111 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती, तर आता मंगळवारी 7 हजार 633 नव्या कोरोनाबाधितांची नोंद (Coronavirus Cases) करण्यात आली आहे.


आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांतील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. 7 हजार 633 नव्या कोरोना रुग्णांसह, कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 61 हजार 233 वर पोहोचली आहे. 24 तासांत 6 हजार 702 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 


एकट्या दिल्लीत 11 पैकी 4 मृत्यू


अनेक राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर आहे. जिथे कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे, तिथे मृतांचा आकडा वाढला आहे. देशभरातील 11 मृत्यूंपैकी 4 मृत्यू एकट्या दिल्लीत झाले असून केरळमध्ये 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हरियाणा, कर्नाटक आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 4 कोटी 48 लाख 34 हजार 859 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 4 कोटी 42 लाख 42 हजार 474 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात बरे होण्याचे प्रमाण 98.68 टक्के आणि मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवलं गेलं आहे.


कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी वाढ पाहता प्रशासनाकडून कोरोना गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांमध्ये मास्क घालणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तर, काही राज्यांमध्ये मास्क घालण्यासोबतच सॅनिटायझर वापरण्याच्या आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाचे रुग्ण कमी असले तरी अजूनही धोका टळलेला नाही. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. प्रशासनाकडूनही तसं आवाहन सातत्यानं केलं जात आहे. 


काळजी घ्या, मास्क वापरा!


सद्यस्थितीत आढळून येत असलेला व्हेरिएंट्स फारसा घातक नसून यात रुग्ण घरी उपचार घेऊन देखील बरा होत आहे. पेशंटला व्हेंटिलेटर किंवा आयसीयू बेडची गरज पडत नाही. परंतु पेशंटला मात्र काही प्रमाणात त्रास होतो आणि म्हणून पेशंट असेल किंवा सीनियर सिटीजन असतील, यांना देखील विशेष काळजी घेण्याचा आवाहन सरकारने केलेले आहे. गरज असेल तिथे मास्कचा वापर करा, विशेष करून गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये, जिथे इन्फेक्शनचा धोका असतो, तिथे मास्क जर लावला पाहिजे असे देखील सूचना भारती पवार यांनी दिल्या आहेत.