नवी दिल्ली : यंदा संपूर्ण देशातून आयकर वसुली चांगली झालू असून, 15 जूनपर्यंत करवसुलीच्या प्रमाणात 26.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 जूनपर्यंत संपूर्ण देशभरातून 1,01,024 कोटी रुपये आयकर वसुली झाली आहे. गेल्यावर्षी याच काळातील हा आकडा 80,075 कोटी रुपये होता. आयकर वसुलीचे प्रमाण वाढल्याने, देशाची आर्थिक स्थिती भक्कम होण्यास पुरक ठरेल असं बोललं जात आहे.


आयकर विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 15 जूनपर्यंत चार महानगरातील मुंबईतून सर्वाधिक करवसुली झाली. यात मुंबईतून करवसुलीचं प्रमाण 138 टक्क्यांनी वाढू होऊन, 22,884 कोटी आयकर वसुली झाली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा 9,614 कोटी रुपये होता. संपूर्ण देशाचा विचार केल्यास मुंबईतून करवसुलीचं प्रमाण एक तृतीयांश असल्याचं सांगण्यात येत आहे.

यानंतर दुसरा क्रमांक दिल्लीचा असून, दिल्लीतून 15 जूनपर्यंत 38 टक्के म्हणजे 11,582 कोटी रुपये करवसुली झाली. गेल्यावर्षी हा आकडा 8 हजार 334 कोटी रुपये होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामधून 7 टक्के म्हणजे, 4,084 कोटी रुपये करवसुली झाली. गेल्यावर्षी हा आकडा 3 हजार 815 कोटी रुपये होता.

तर बंगळुरुमधून करवसुलीत 6.8 टक्के वाढ होऊन, 14 हजार 923 कोटी रुपये झाली. गेल्यावर्षी हाच आकडा 13 हजार 973 कोटी रुपये होता. तर चेन्नईमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी करवसुली झाली. यंदा चेन्नईमधून 8591 कोटी रुपये करवसुली झाली असून, गेल्या वर्षी हाच आकडा 8 हजार 968 कोटी रुपये होता.

नामांकित कंपन्या आणि आयकर भरणाऱ्यांना सोपं जावं म्हणून, आयकर विभागाकडून तिमहीच्या शेवच्या महिन्यातील 15 तारेखेपर्यंत आयकर भरण्यास परवानगी देते. त्याचा यंदा चांगलाच फायदा झाल्याचं चित्रं आहे.