मुंबई : देशाची अर्थव्यवस्था सातत्याने घसरत आहे. देशभरात महागाई वाढू लागली असताना माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी भाष्य केले आहे. सुब्रमण्यन म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था घसरणीला लागलेली असताना शेअर बाजार उत्साहात कसे काय? हे मोठे कोडे माझ्यासमोर आहे.


अरविंद सुब्रमण्यन हे 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात आर्थिक सल्लागार पदी होते. इंडियन इन्स्टीट्यूट मॅनेजमेंट अहमदाबाद येथील 'सेंटर फॉर बिहेवियर सायन्स इन फायनन्सच्या' उद्घाटनावेळी उपस्थित होते. सल्लागार म्हणून राजीनामा दिल्यानंतर संशोधन आणि शिकविण्याचं काम पुन्हा सुरू केलं. माजी आर्थिक सल्लागारानेच ही टीका केल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

सुब्रमण्यन म्हणाले, मी आशा करतो की या केंद्रात होणारे संशोधन प्रकल्प माझे कोडे सोपे करण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या अभ्यासात मला देशाची अर्थव्यवस्था का खाली जात आहे आणि शेअर बाजार कसा वरती जात आहे, या शंकेचे निरसण होईल.

देशात अर्थव्यवस्था घसरणीला लागलेली आहे. मार्केटमधला पैशाचा ओघ आटला आहे. नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. बँकेत पैसे ठेवूनही त्याचं फारसं व्याज मिळत नाही. त्यामुळे पैसे गुंतवावे तरी कसे असा सगळ्यांना प्रश्न पडलाय. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतेय मात्र अजूनही काही महिने अत्यंत अडचणीचे असल्याचे सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत काहीही बोलत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून टीका सुरु आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था आणि जीएसटीबाबत भाष्य केले आहे. भारताच्या व्यापार आणि उद्योगांच्या शिखर संघटनेच्या (Associated Chambers of Commerce and Industry of India ) वार्षिक सभेत मोदी यांनी याविषयी भाष्य केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची घोषणा केली. परंतु ही गोष्ट अचानक आलेली नाही. मागील पाच वर्षात देशाने स्वतःला मजबूत केलं आहे. त्यामुळे देश आता पाच ट्रिलिय अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहू शकतो. आमच्या सरकारने देशाची जीएसटीबाबतची मागणी पूर्ण केली. काँग्रेसला निशाणा करत मोदी म्हणाले की, 70 वर्षांची सवय बदलण्यासाठी थोडा वेळ लागेल.