नवी दिल्ली : महात्मा गांधीच्या हत्येचा पुन्हा तपास व्हावा, यासाठी दाखल याचिकेवर 30 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. तसेच याप्रकरणी देशाचे माजी महाधिवक्ते आणि ज्येष्ठ वकील अमरेंद्र शरण यांना एमेकस क्यूरी (न्यायालयाचे मित्र) म्हणून नियुक्त केलं आहे.


न्यायमूर्ती एस.ए. बोबडे आणि न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. जवळपास 15 मिनीट झालेल्या आजच्या सुनावणीत, उच्च न्यायालयाने पहिल्यांदा ज्या प्रकरणावर अनेक वर्षांपूर्वी निर्णय झाला आहे. या घटनेत दोन आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे. तसेच याप्रकरणाशी संबंधित इतरही लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मग अशावेळी कायद्याचं पुन्हा औचित्य काय असेल? तसेच या प्रकरणी याचिकाकर्त्याकडे आणखी कोणते पुरावे आहेत का? असे विविध प्रश्न विचारले.

गांधी हत्येसंदर्भातील फेर तपासणी करण्यासाठी अभिनव भारत, मुंबईचे संशोधक आणि विश्वस्त पंकज फडणीस यांनी एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये गांधी हत्येला इतिहासाचा सर्वात मोठा कव्हर-अप असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या हत्येच्या सखोल तपासासाठी एक समिती स्थापन करुन, या मागच्या षडयंत्राचा पर्दाफाश करावा, असंही याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे.

याचिकाकर्त्याने या हत्येचा तपास केलेल्या समितीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. इतिहासातील या सर्वात मोठ्या घटनेमागचं सत्य लपवलं जात आहे का? तसेच गांधीजींच्या हत्येसाठी विनायक दामोदर सावरकरांना दोषी धरण्याला काही आधार होता का?,  असंही असे विविध प्रश्न फडणीस यांनी उपस्थित केले आहेत.

विशेष म्हणजे, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 1966 मध्ये स्थापन केलेल्या न्यायमूर्ती जे.एल.कपूर यांच्या आयोगाला या षडयंत्राचा सखोल तपास करण्यात अपयश आला असल्याचा आरोप फडणीस यांनी केला आहे. तसेच हे षडयंत्र राष्ट्रपतींच्या हत्येपर्यंत येऊन पोहोचत असल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, गांधी हत्या प्रकरणातील दोषींना 15 नोव्हेंबर 1949 रोजी फाशी देण्यात आली. तर सावरकरांना पुरेशा पुराव्याअभावी संशयित म्हणून म्हणले गेले होतं. सावरकरांपासून प्रेरणा घेऊन 2001 मध्ये अभिनव भारताची मुंबईत स्थापना झाली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी काम करत असल्याचा दावा केला जातो.