मुंबई : ऐन अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधीच शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. आज (बुधवार) शेअर बाजारात पहिल्यांदाच सेंसक्सने आज ३५ हजारांचा टप्पा ओलांडून विक्रमी कामगिरी केली. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच निफ्टीने देखील 10,800 चा आकडा गाठला.


मागील वर्षी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2017ला सादर करण्यात आला होता. तेव्हापासून ते 17 जानेवारी 2018 पर्यंत बीएसईवर नोंद असलेल्या कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या भांडवलात 40.5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. यामुळेच आज शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली. याचवेळी 1 जानेवारी 2018पासून आतापर्यंत, गुंतवणुकीची म्हणजेच भांडवलीकरणाची किंमत 3.38 लाख कोटींनी वाढली आहे.

सुरुवातीला बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात धीम्या गतीनं झाली होती. पण अर्थ मंत्रालयाकडून एक निवदेन देण्यात आल्यानंतर बाजारात मोठ्या घडामोडी सुरु झाल्या. मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘चालू आर्थिक वर्षात अतिरिक्त कर्ज घेण्याची क्षमता 50 हजार कोटी रुपयांची नसून फक्त 20 हजार कोटी रुपये असेल. अतिरिक्त कर्जाच्या रकमेतील बदलाचे कारण म्हणजे उत्पन्न आणि खर्चाचे नवीन मूल्यांकन आहे.’ सरकारच्या या घोषणेनंतर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीस सुरुवात झाली.

दुसरीकडे, कर्ज घेण्यामध्ये कपात होईल अशा अंदाजामुळे शेअर बाजारात त्याचे चांगले परिणाम दिसून आले. आता अशी अपेक्षा आहे की बाजारातील या नव्या वातावरणात बँका आणि वित्तीय संस्थांची कमाई वाढेल. याशिवाय गुंतवणूकदारांनी एफएमसीजी, आयटी, मेटल, फार्मा, कॅपिटल गुड्स आणि वीज यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी केली आहे. दरम्यान, या तेजीच्या वातावरणात प्रसारमाध्यम, तेल, वायू आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचे शेअर मात्र घसरले आहेत.

बुधवारी शेअर बाजारात सेंसेक्स 35072 अंकांवर बंद झाला. जो मंगळवारपेक्षा 310 अंकांनी जास्त आहे. तर निफ्टी मंगळवारपेक्षा 88 अंकांनी म्हणजेच 10788 अंकांवर बंद झाला.

जाणकारांच्या मते, पुढील काही दिवस शेअर बाजारात तेजी पाहायला मिळेल. तसेच जर शेअर खरेदी-विक्रीतून होणाऱ्या नफ्यावरील टॅक्सबाबतच्या नियमामध्ये येत्या अर्थसंकल्पात कोणताही बदल झाला नाही तर त्याचा बाजारावर चांगला परिणाम पाहायला मिळेल. दरम्यान, तेजीच्या या वातावरणात छोट्या-छोट्या गुंतवणूकदारांनी म्युचअल फंड आणि एसआयपीमध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल असंही जाणकारांचं मत आहे.