नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातले शेतकरी आक्रमक झाले असतानाच आता या विषयावर राजकारणही तापण्याची चिन्हं आहेत. या कायद्याविरोधात उद्या शरद पवार, राहुल गांधी यांच्या सोबत विरोधी पक्षाचे नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. याबाबत सीपीआय (एम) चे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितलं की विरोधी पक्षाचे एक प्रतिनिधीमंडळ उद्या संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.


सीताराम येचुरी म्हणाले की, "या प्रतिनिधी मंडळात राहुल गांधी, शरद पवार यांच्यासहित इतर विरोधी पक्षाचे नेते सामिल होणार आहेत. कोरोनाच्या प्रोटोकॉलमुळे राष्ट्रपतींना केवळ पाच लोकांना भेटायची अनुमती आहे."


माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं की, "राष्ट्रपतींना भेटण्यापूर्वी ते विविध राजकीय पक्षांशी या कायद्यांच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत." शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. पण ती भेट कृषी कायद्यासंदर्भात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


गेल्या तेरा दिवसांपासून दिल्लीच्या सिंघु बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या मुद्द्यावरुन शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या पाच फेऱ्याही झाल्या आहेत पण कोंडी काही फुटली नाही. हा कायदा पूर्णपणे मागे घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुधवारी सरकारशी पुन्हा या विषयावर चर्चा होणार आहे. सरकारच्या या नव्या कृषी कायद्यांविरोधात मंगळवारी भारत बंदचेही आवाहन करण्यात आलं आहे. या बंदला कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, टीएमसी आणि समाजवादी पक्षासह इतर अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.


महत्वाच्या बातम्या: