नवी दिल्ली : बिहार सरकारमधील जनता दलाचे मंत्री खुर्शीद उर्फ फिरोज अहमद यांनी 'जय श्रीराम'चा नारा दिल्याने, अडचणीत आले आहेत. कारण यामुळे त्यांच्याविरोधात फतवा जारी करुन, त्यांना बहिष्कृत करण्यात आलं आहे. दरम्यान, याप्रकरणी त्यांनी माफीनामाही सादर केला आहे.


बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर मंत्री फिरोज अहमद यांनी 'जय श्रीराम'चा नारा दिला होता. बहुमत सिद्ध केल्यानंतर फिरोज म्हणाले की, ''बिहारच्या जनतेसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, रक्षणासाठी, आणि देशात सलोखा राहावा यासाठी मला 'जय श्रीराम' म्हणावं लागलं, तरी मी मागे हाटलो नाही. आणि आजही हाटणार नाही.''

यानंतर त्यांच्याविरोधात फतवा जारी करुन त्यांना मुस्लीम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलं. विशेष म्हणजे, या फतव्यामुळे त्यांचा निकाह मोडला. फतव्यानुसार, त्यांना या कृतीवर माफीनामा सादर करुन, निकाह करण्याची परवानगी दिली होती.

दरम्यान, फिरोज यांच्या या कृतीमुळे अल्पसंख्याक समाजही कमालीचा नाराज असल्याचं पाहायला मिळालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज अल्पसंख्याकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांसह मंत्री फिरोज हे देखील उपस्थित होते.

या बैठकीत फिरोज यांना अल्पसंख्याक समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. यानंतर त्यांनी या प्रकरणी माफीनामा सादर करत, आपल्या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.