नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज 'मन की बात' कार्यक्रमातून 2017 ते 2022 पर्यंतचा अजेंडा देशवासियांसमोर मांडला. या पाच वर्षात देशवासियांनी अस्वच्छता, गरीबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवादाला मुठमाती देण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचं आवाहन केलं.


पंतप्रधान मोदी म्हणाले की,  ''महात्मा गांधींनी 9 ऑगस्ट 1942 मध्ये 'भारत छोडो'  आंदोलनाची सुरुवात केली. गांधीजींचं हे आंदोलन 1942 ते 1947 पाच वर्ष चाललं. या पाच वर्षांच्या काळात या आंदोलनाने संपूर्ण देश ढवळून निघाला. देशाला स्वतंत्र्य मिळून देण्यात या आंदोलनाची मोठी भूमिका आहे. आता या आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा दिवस देशवासियांनी संकल्प दिवस म्हणून साजरा करावा.''

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''या दिवशी देशवासियांनी अस्वच्छता, गरीबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवादाला मुठमाती देण्याचा संकल्प करुन, देशाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी संकल्पबद्ध व्हावे,'' असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

2017 ते 2022 च्या कार्यकाळात देशवासियांनी आपला संकल्प पूर्ण केल्यास, देशासाठी हा एक निर्णायक टप्पा ठरेल, असंही त्यांनी यावेळी सांगून, आपला अजेंडा देशवासियांसमोर मांडला.

याशिवाय, देशाच्या विविध भागांतील पूरसदृश्य परिस्थितीवरही चर्चा केली. ते म्हणाले की, ''जेव्हा देशात नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संघटना यावेळी पुढे येऊन, मोठं योगदान देतात. यावेळी सरकारी यंत्रणा, भारतीय सैन्यदल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आदी विभाग पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रचंड मेहनत घेतात.''

पीकविम्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ''पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्याप्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे शेतकऱ्यांचं हे नुकसान भरुन काढण्यासाठी पीकविम्याच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे.''