जम्मू आणि काश्मीर : जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmit) अनंतनागमध्ये सध्या भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist) चकमक सुरु आहे. या चकमकीमध्ये आणखी एक जवान जखमी झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. अनंतनागमध्ये गोळीबार सुरुच असून यामध्ये जवानाच्या पायाला गोळी लागल्याचं सांगण्यात येत आहे.  दरम्यान दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानाचा (Pakistan) हात असल्याची माहिती देखील समोर आली आहे.


डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या सूत्रांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच दिवसांपासून क्रॉस बॉर्डर कॉलवरुन असं सांगण्यात इंटरसेप्शनवरून असे दिसून आले आहे की, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचे नियोजन पाकिस्तानात स्थित असलेल्या दहशतवाद्यांकडून करण्यात येत होते. तर भारतीय सैन्याकडून ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर करण्यात येत आहे. 


ड्रोनच्या माध्यमातून तपास सुरु


भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिथे दहशतवादी असल्याची शंका आहे. त्या भागात हेरॉन ड्रोनच्या माध्यमातून तपास करण्यात येत आहे. तसेच आवश्यकता असेल तर गरज पडल्यास रात्रीच्या वेळेस सैन्याला शोधमोहिम राबवण्यासाठी योग्य उपकरणं देखील उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांकडून सातत्याने परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. सध्या दोन शहिद जवानांचे पार्थिव हे श्रीनगरमध्ये आणण्यात आले आहे. बुधवार (13 सप्टेंबर) रोजी राजौरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये तीन अधिकारी शहीद झाले. यामध्ये लष्कराचे कर्नल, मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपअधीक्षक यांचा समावेश आहे. 






राजकीय वर्तुळात दावे- प्रतिदावे 


दरम्यान या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून देखील दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. काँग्रेसकडून मोदी सरकावर निशाणा साधण्यात आलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असंवेदनशील असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते कर्नल रोहित चौधरी यांनी म्हटलं की, 'जेव्हा आपल्या देशाचे जवान देशासाठी बलिदान देत आहेत, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या स्वत: चं कौतुक करुन घेत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजपला आपल्या देशातील जवानांची आठवण कशी आली नाही असा सवाल देखील काँग्रेसने यावेळी उपस्थित केला आहे.' 


फारुक अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया 


काश्मीरमध्ये दहशतवाद कधीही संपणार नाही अशी प्रतिक्रिया जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुला यांनी दिली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'काश्मीरमध्ये रोज हल्ले होत आहे. कोण म्हणतं काश्मीरमधला दहशतवाद संपला? काश्मीरमधील दहशतवाद कधीही संपणार नाही. काश्मीरमधील प्रश्न सोडवण्याची गरज आहे. ' 


हेही वाचा : 


Jammu Kashmir Anantnag Encounter: अनंतनागमधील दहशतवादी हल्ल्यात कर्नल, मेजर आणि पोलीस उपअधीक्षकांना हौताम्य; TRF ने घेतली जबाबदारी, चकमक सुरू