नवी दिल्ली : कुतुबमिनारच्या परिसरात हिंदूंना पूजेचा अधिकार मिळावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्लीच्या साकेत कोर्टात आज सुनावणी होणार आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या वादानंतर देशातील अन्य काही धार्मिक स्थळांबाबतही वाद पुढे आला आणि तो कोर्टात गेला आहे. कुतुबमिनार म्हणजे विष्णुस्तंभ आहे आणि या परिसरात शिव, गणेश, सूर्य, देवी गौरी यांच्यासह काही जैन मंदिरं होती, असा दावा करण्यात येत आहे. 27 हिंदू आणि जैन मंदिरांना उद्ध्वस्त करुन त्याच सामग्रीतून मशिद उभारण्यात आली, असाही दावा केला जात आहे. या वादावर कोर्टात आज सकाळी सुनावणी होणार आहे.


ही याचिका वकील हरि शंकर जैन आणि वकील रंजना अग्निहोत्री यांच्यावतीने दाखल करण्यात आली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टात दाखल याचिकेत दावा केला आहे की,  कुतुब मीनार परिसरात हिंदू देवी देवतांच्या अनेक मूर्ती आहेत. याशिवाय कुतुबमिनार परिसरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे कलश, स्वस्तिक आणि कमळ यांसारखी प्रतिकं दिसतात, ज्यावरुन ही इमारतमधील हिंदूंचं अस्तित्त्व अधोरेखित करतं. 


कोर्टात दाखल याचिकेत म्हटलं आहे की, सध्याच्या कुतुबमिनार परिसरात भगवान विष्णु ऋषभ देव, शिव, गणेश, सूर्य आणि देवी गौरी, यांच्यासह जैन तीर्थंकर, नक्षत्रांसह भव्य आणि उंच हिंदू आणि जैन मंदिरं आहेत. मेरु टॉवरलाच आता कुतुब मिनार म्हटलं जातं, असंही याचिकेत म्हटलं आहे.


भारतीय पुरातत्व विभागाच्या दाखला
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग अर्थात एएसआयचा दाखल देत याचिकेत म्हटलं आहे की, कुतुबमिनार परिसरात असे शिलालेख आहे ज्यावरुन सिद्ध होतं की तिथे 27 हिंदू आणि जैन मंदिरं उद्ध्वस्त करुन त्याच सामग्रीचा वापर करुन परिसराच्या आत कुव्वत-उल-इस्लाम मशिद बांधण्यात आली आहे.


देवी गौरी, भगवान विष्णु, शिव, गणेश, सूर्य, हनुमान आणि भगवान ऋषभ देव यांची मंदिरं या ठिकाणी पुन्हा बांधण्याचा अधिकार दिला जावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.


मागील सुनावणीत कोर्टाने काय म्हटलं होतं?
या प्रकरणाच्या मागील सुनावणी कोर्टाने भारतीय पुरातत्व विभागला नोटीस जारी करुन या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितलं होतं. तर दुसऱ्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने कुतुबमिनार परिसरात ठेवलेल्या हिंदू देवी देवतांच्या मूर्ती हटवण्यावर बंदी घातली होती.