Congress Social Media Profile Photo : मोदीच्या आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल गुजरातच्या सुरत कोर्टाने (Surat Court) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ही शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला. राहुल गांधी कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. न्यायालयाचा निर्णय येताच एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) आपल्या अधिकृत सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो (Profile Photo) बदलला. त्यानंतर सर्व काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनीही आपले प्रोफाईल फोटो बदलण्यास सुरुवात केली. काँग्रेसने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट यांसारख्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन प्रोफाईल फोटो अपलोड केला आहे. हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा आहे, ज्यावर लिहिलं आहे की 'डरो मत'.


काँग्रेस नेत्यांनीही प्रोफाईल फोटो बदलला


राहुल गांधी यांच्याबाबत निकाल येताच काँग्रेस नेत्यांनीही त्यांचे प्रोफाईल फोटो बदलले आहेत. इतकंच नाही तर काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम हँडलचा डीपीही बदलला आहे. या सगळ्या अकाऊंटवर राहुल गांधी यांचा ब्लक अॅण्ड व्हाईट फोटो लावण्यात आला आहे. त्यावर लिहिलं आहे की, 'डरो मत'. राहुल गांधी यांचा हा फोटो भारत जोडो यात्रेदरम्यान काढण्यात आला होता.


सोनिया गांधी यांनी घेतली राहुल यांची भेट 


राहुल गांधी गुरुवारी (23 मार्च) संध्याकाळी सुरतहून दिल्लीत पोहोचले. राहुल दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या घरासमोर कार्यकर्ते आणि समर्थक जमा झाले होते. सोनिया गांधीही मुलगा राहुल यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. हुतात्मा दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना आदरांजली वाहताना राहुल गांधी यांनी निकालानंतर लगेचच ट्वीट केलं की, "मी भारतमातेच्या या शूर सुपुत्रांकडून सत्य आणि धैर्याला चिकटून देशासाठी निर्भयपणे लढायला शिकलो आहे."


राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून साम, दाम, दंड, भेदाचा वापर : प्रियंका गांधी


न्यायालयाने राहुल गांधी यांच्याबाबत दिलेल्या निर्णयावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करुन लिहिलं की, 'घाबरलेले सरकार  संपूर्ण यंत्रणा साम, दाम, दंड भेद वापरुन राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझा भाऊ कधी घाबरला नाही, कधी घाबरणार नाही. तो सत्य बोलत जगला, सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू. सत्याची ताकद आणि कोट्यवधी देशवासीयांचे प्रेम त्याच्या पाठीशी आहे.


काय आहे प्रकरण?


राहुल गांधीनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरुन टीका केली होती. राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल (23 मार्च) त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. तसंच उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोर्टाने राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ दिला आहे.