Coronavirus Cases in India : देशात गेल्या तीन दिवसांपासून वाढत असलेला कोरोना संसर्ग किंचित कमी झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात गुरुवाी 20 हजार 551 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 53 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


महाराष्ट्रात शुक्रवारी पाच जणांचा मृत्यू


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाराष्ट्रात 2024 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 2190 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात सध्या 11906 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 2190 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 78,95,954 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 






मुंबईत गुरुवारी 410 रुग्णांची नोंद


मुंबईत गुरुवारी 410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात एकूण 12 हजार 77 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 3 हजार 386 इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 2 हजार 235 सक्रिय रुग्ण आहेत.


सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 34 हजारांवर


भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 65 हजार 552 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या भारतात 1 लाख 34 हजार 793 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 928 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे, ही एक दिलासादायक बाब आहे.