गोव्यात काँग्रेस, बिहारमध्ये राजदच्या सत्तास्थापनेसाठी हालचाली
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2018 11:34 PM (IST)
गोव्यात काँग्रेसच्या 13 आमदारांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि बहुमताच्या आधारावर सर्वात मोठ्या पक्षाचा दावा करुन सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण देण्याची मागणी केली.

नवी दिल्ली : जो न्याय कर्नाटकात दिला तोच गोवा, मणिपूर, मेघालयमध्ये मिळावा यासाठी काँग्रेस आमदार आक्रमक झाले आहेत. गोव्यात काँग्रेसच्या 13 आमदारांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि बहुमताच्या आधारावर सर्वात मोठ्या पक्षाचा दावा करुन सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण देण्याची मागणी केली. बिहारमध्येही राजदने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही राज्यपालांची भेट घेतली आणि बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली. 'आम्ही सत्तास्थापनेचा दावा करत आहोत. आमच्याकडे अनेक पक्ष आणि आमदारांचं समर्थन आहे' असं पत्र राजद आणि त्यांच्या मित्रपक्षांनी राज्यपालांना दिलं आहे. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते ओकराम इबोबी सिंह यांनीही राज्याचे कार्यवाहक राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतली. राज्यपाल या प्रकरणी न्याय देतील, अशी आशा सिंह यांनी व्यक्त केली. आता कर्नाटकमध्ये भाजपने फेकलेले फासे भाजपवरच उलटणार का, की त्यातूनही भाजप तिसरा मार्ग काढणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.