नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) 10 लाखांहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देशात कोरोनाचा समूह संसर्ग (Community Transmission) सुरु झालं असल्याचं म्हटलं आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर व्ही. के मोंगा यांनी याबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. डॉ. मोंगा म्हणाले की, प्रत्येक दिवशी देशात 30 हजारहून जास्त रुग्ण समोर येत आहेत. ही फार गंभीर स्थिती आहे. आता हा संसर्ग देशातील ग्रामीण भागात देखील सुरु झाला, याचा अर्थ असा आहे की, देशात  कम्युनिटी ट्रांसमिशन सुरु झालं आहे, असं डॉ. मोंगा यांनी म्हटलंय.


डॉक्टर मोंगा यांनी म्हटलं आहे की, कोरोना विषाणू आता ग्रामीण भागातही पसरत आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. दिल्लीमध्ये आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमधील दुर्गम भागात काय होणार? असं ते म्हणाले.

केरळमध्ये काही भागात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड : मुख्‍यमंत्री पी विजयन

ते म्हणाले की, कोरोना हा असा आजार आहे, जो खूप वेगाने पसरत आहे. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांनी संपूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे, तसेच केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे. या व्हायरल आजाराला रोखण्यासाठी 70 टक्के लोकसंख्येची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यावर लक्ष द्यावं असंही त्यांनी म्हटलंय.

Corona vaccine | कोरोनावरील लसीच्या संशोधनाला सकारात्मक यश : केंद्रीय आरोग्य मंत्री अश्वनी चौबे

मागील 24 तासात 38 हजार 902 नवीन रुग्ण 

अमेरिका आणि ब्राझिलनंतर आता भारतात एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात आता कोरोनाबाधितांची संख्या दहा लाखांवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत 10 लाख 77 हजार 618 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 26,816 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 6 लाख 77 हजार 422 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासात कोरोनाचे 38 हजार 902 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 543 मृत्यू कोरोनामुळं झाला आहे.

भारत जगात तिसऱ्या नंबरवर
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत अमेरिका, ब्राझिलनंतर तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिकेत 3,833,271 कोरोनाबाधित आहेत तर ब्राझिलमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 2,075,246 वर पोहोचला आहे.