श्रीहरीकोटा : अंतराळात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 चं आज (22 जुलै) प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं. चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम आहे. याआधी भारताने 2008 मध्ये चंद्रयान 1 चं प्रक्षेपण केलं होतं.


चांद्रयान-2 च्या निमित्ताने 11 वर्षांनी इस्रो पुन्हा एकदा चंद्रावर तिरंगा फडकावणार आहे. सगळं काही यशस्वी झालं तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश बनेल. चंद्राच्या या भागात उतरण्याचं धाडस अद्याप कोणत्याही देशाने केलेलं नाही.

चांद्रयान-2 सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर चंद्रावर उतरेल. चंद्रावर उतरण्यासाठी चांद्रयान 2 ला जवळपास 55 दिवस लागतील. चांद्रयान चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरेल. यानंतर वैज्ञानिकांना चंद्राच्या अनेक रहस्यांचा उलगडा होईल.



प्रक्षेपण झाल्यानंतर पुढे काय?

- पृथ्वीपासून 181.6 किमी अंतरावर गेल्यावर चांद्रयान-2 प्रक्षेपकापासून वेगळं झालं.
- यानंतर 23 दिवस चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत राहिल.
- 30 ते 42 दिवसात चांद्रयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल.
- 48 व्या दिवशी विक्रम हे लॅण्डर आणि प्रग्यान हे रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल
- चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीननंतर जगातील चौथा देश बनेल, तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरेल.
- 7 सप्टेंबर रोजी चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग होईल.

चांद्रयान 2 चे तीन भाग
चांद्रयान 2 ला तीन भागात विभागण्यात आलं आहे. पहिला भाग ऑर्बिटर आहे, जो चंद्राच्या कक्षेत राहिल. दुसरा भाग लॅण्डर ज्याचं नाव आहे विक्रम, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तर तिसरा भाग आहे प्रग्यान जो रोव्हर असून तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत राहिल.

पहिलं प्रक्षेपण स्थगित

गेल्या सोमवारी म्हणजे 15 जुलैला चांद्रयान 2 लॉन्चिंग स्थगित झालं होतं. त्यानंतर 22 जुलै रोजी दुपारी 2.43 मिनिटांनी चांद्रयान 2 चं लॉन्चिंग होईल, असं इस्रोने जाहीर केलं होतं.

जीएसएलव्ही मार्क 3 या प्रक्षेपकाच्या मदतीने मागील सोमवारी पहाटे चांद्रयान 2 झेपावणार होतं. मात्र तांत्रिक कारणांमुळे लाँचिंग काऊंटडाऊनच्या जवळपास 56 मिनिट आधीच मोहीम स्थगित करण्यात आली होती. भारतच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलं होतं. वेहिकल सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून चांद्रयान-2 चं लॉन्चिंग थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं इस्रोने घेतला होता.

आठवड्याचा विलंब का?

चांद्रयान- 2 मध्ये क्रायोजेनिक इंधन भरताना तांत्रिक बिघाड लक्षात आल्याने काऊंटडाऊन थांबवण्यात आलं. इंधन टँकमधून सगळं इंधन काढून पुन्हा तपासणीसाठी आठवडाभर वेळ गेला.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाशात झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहोचेल. झेप घेतल्यानंतर हे चांद्रयान 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे.

भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताला तब्बल 978 कोटी रुपये खर्च आला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या यानाचे सर्व भाग स्वदेशी आहेत. या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, त्यावर उपलब्ध असलेली खनिजं, रसायनं आणि त्यांचा अभ्यास केला जाणार आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमिनीखाली कोणती खनिजं दडली आहेत, तिथे पाण्याचा अंश आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चांद्रयान 2 मधील रोव्हरने केलेल्या तपासणीनंतर मिळतील.

चांद्रयान 2 मोहिमेची वैशिष्ट्ये काय?




  • चांद्रयान तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर पार करुन चंद्रावर पोहोचणार

  • चंद्रावर पोहचण्यासाठी चांद्रयान 2 ला 55 दिवसांचा कालावधी लागणार

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर प्रज्ञान उतरेल

  • चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान चंद्रावरची माहिती कंट्रोल सेंटरला पाठणार


चांद्रयान 2 मोहिमेतील अडचणी आणि आव्हान




  • अंतराळात चंद्राच्या गतीबरोबरच चांद्रयान 2 च्या गतीवर नियंत्रण ठेवणे

  • चांद्रयान 2 पृथ्वीपासून 3 लाख किमीच्या अंतरावर असल्याने त्याच्याशी संपर्क कायम ठेवणे

  • चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रोवर आणि लँडर विक्रम उतरवणे

  • चंद्रावरच्या तापमानासह धुळीचाही मोहिमेवर परिणाम होऊ शकतो



संबंधित बातम्या