विरोध असल्यास नाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री
जोरदार विरोधानंतरही नाणार प्रकल्पाला केंद्र सरकारचा हिरवा कंदील
एबीपी माझा वेब टीम | 11 Apr 2018 07:18 PM (IST)
शिवसेनेचा विरोध डावलून अखेर रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पाला केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दिला आहे.
नवी दिल्ली : शिवसेनेचा विरोध डावलून अखेर रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पाला केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दिला आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर आज (बुधवार) नवी दिल्लीत सह्या झाल्या आहेत. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळील नाणार येथे उभारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी सांगितले असून सविस्तर बोलणी सुरु असल्याचे ते म्हणाले. भारताच्या पश्चिम किनारी असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील तसेच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असे सांगण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल. असे मत धर्मेंद प्रधान यांनी व्यक्त केले आहे. नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. संबंधित बातम्या :