नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून कोरोना राष्ट्रीय आपत्ती घोषित झाली आहे. मात्र, त्याअंतर्गत कोरोनामुळे बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना दिली जाणारी 4 लाखांची मदत मागे घेण्यात आली आहे. मृतांच्या नातेवाईकांपेक्षा कोरोनाग्रस्तांसाठी हा निधी वापरण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने खळबळ उडाली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याने दोघांचा बळी गेला आहे. कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू होईल त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला होता. मात्र नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.


मोदी आणि ठाकरे यांच्यात चर्चा
देशात आणि खासकरुन महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज फोनवरुन चर्चा झाली. एएनआयच्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचा आढावा घेतला. तसंच सुरक्षेचे काय उपाय योजता येतील याविषयीही चर्चा केली.

कोरोनाने दोघांचा मृत्यू

भारतात कोरोनाची लागण झाल्याने आधी कर्नाटकात एका वृद्ध रुग्णाचा आणि दिल्लीत एका वृद्ध महिलेचा असे दोन मृत्यू झाले आहेत. दिल्लीतील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच अमेरिका, जपान आणि इटलीला जाऊन आला होता. त्यानंतर मुलापासून आईला कोरोनाची लागन झाली होती. दरम्यान, मोदी सरकारने कोरोना हे राष्ट्रीय संकट घोषित केलं आहे.

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर 


राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 32 वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 80 संशयित असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांची दिली आहे. रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांची तपासणीदेखील लवकर होणे गरजेचं आहे. त्यासाठी लॅब्सची क्षमता दुप्पट करण्याचाही प्रयत्न आहे. येत्या 15 ते 20 दिवसात मुंबई, पुण्यात नवीन लॅब सुविधा देणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबादमध्येही नवीन लॅब संदर्भातला निर्णय होऊ शकतो, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.


एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती


एपीएससीच्या परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी एकत्र जमतात. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी एमपीएससीची परीक्षाची रद्द करण्याची विनंती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला करण्यात येणार आहे. ही परीक्षा 30 मार्चनंतर घेण्यात यावी असं सुचवण्यात येत आहे. तसेच घरगुती, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम थांबवण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईच्या सूचना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.


संबंधित बातम्या :