नवी दिल्ली : काल हैदराबादमधल्या निर्भयाच्या गुन्हेगारांचा एन्काऊंटर झाल्यानंतर देशभर जल्लोष सुरु होता. मात्र आज देशभर संतापाची लाट उसळली आहे.. कारण उन्नाव बलाक्तार प्रकरणातील पीडितेची मृत्यूची झुंज अपयशी ठरलीय. आरोपींनी अत्याचारानंतर पीडितेला जिवंत पेटवलं होतं. दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झालाय. या घटनेविरोधात संताप व्यक्त करत दिल्लीकरांनी इंडियागेटवर कँडल मार्च काढला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा फवारा मारत त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बांगड्या दाखवत पोलिसांचा निषेध केला.


आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरेकेट्स लगावले होते. हा अडथळा दूर करुन पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी केला. यात महिलांसह पुरुष देखील सहभागी होते. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पाणी फवारणी केल्याचा प्रकार पाहायला मिळाला.

उन्नाव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील पीडितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमांनी तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता. यात ती 90 टक्के भाजली होती. गंभीर असल्यामुळे तिला लखनऊहून एअरलिफ्ट करुन दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी अथक प्रयत्न करुन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आले नाही. तिची प्राणज्योत मावळल्यानंतर देशात संतापाचे वातवरण निर्माण झाले आहे. उन्नाव पीडितेच्या हत्याऱ्यांना फाशी देण्याची मागणी संतप्त जमावाकडून करण्यात आली आहे.