Bodybuilder Amir Chand : कर्करोग म्हटलं की लोकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु, कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करून वयाच्या 88 व्या वर्षी देखील पंजाबच्या बॉडीबिल्डचा फिटनेस तरूणांना लाजवेल असा आहे. अमीर चंद असं या वृद्ध बॉडीबिल्डरचं नाव असून ते पंजाबमधील लुधियाना येथील आहेत. अभिनेता अमिर कान देखील या 88 वर्षीय बॉडीबिल्डरचा चाहता आहे. कर्करोगावर मात करून या बॉडीबिल्डरने जीवनाची लढाई जिंकली आहे.  


अमीर चंद यांनी वयाच्या 12 व्या वर्षी बॉडी बिल्डिंगची सुरुवात केली. अमीर चंद यांचं वय आज 88 वर्षे आहे. परंतु, आज देखील ते फिटनेससाठी एकही दिवस व्यायाम चुकवत नाहीत. त्यामुळे एवढ्या वयात देखील एखाद्या तरूणाला लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. बॉडी बिल्डिंगनंतर अमीर चंद यांनी एका बॅंकेत व्यवस्थापक म्हणून नोकरी सुरू केली. परंतु, नोकरी करत असतानाच 1984 मध्ये त्यांना कर्करोगाने घेरले. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांनी मुंबईला येऊन कॅन्सरवर उपचार करून घेतले. उपचारानंतर अमीर चंद अक्षरश: मृत्यूच्या दाडेतून बाहेर आले. अतिशय कठिण परिस्थितीतून बाहेर आल्यावर देखील अमीर चंद हिंमत हारले नाहीत.  कर्करोगातून बरे झाल्यानंतर त्यांनी पुन्हा बॉडी बिल्डिंग सुरू केली आणि पुन्हा मिस्टर पंजाबचा किताब पटकावला. 


अमीर चंद यांचा मुलगा विकास याने याबाबत बोलताना सांगितले की, "आमचे कुटुंब शाकाहारी आहे. माझ्या वडिलांना कर्करोगाने घेरले होते, तरी देखील त्यांनी जीवन-मरणाची लढाई जिंकली आणि पुन्हा बॉडी बिल्डिंग सुरू केली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे कुटुंबही दररोज दोन तास व्यायाम करते. 




अमीर चंद यांनी ज्युनियर रेसलिंग चॅम्पियनशिपपासून सुरुवात केली. त्यांना त्यांच्या वडिलांकडून याची प्रेरणा मिळाली.  अमीर चंद सांगतात की, मी कधीच मांसाहार केला नाही, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊनच सराव केला. माझा जन्म लाहोरमध्ये झाला होता. आजोबांना पाहून मी कुस्ती खेळायला शिकलो आणि बॉडी बिल्डिंगमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. माझ्या पहिल्या विजयात मला पाच किलो बदाम आणि पाच रुपयांचे बक्षीस मिळाले. माझ्या सरावासाठी मी रात्री बाजारात धावत असे. तरुणांना बॉडीबिल्डिंग करायचे असेल तर त्यांनी प्रोटीन आणि सॅटराइडच्या मागे धावू नये. या ऐवजी देसी आणि शुद्ध पदार्थ खा. बदाम, अक्रोड, सोयाबीन, हरभरा, शेंगदाणे, दूध, चीज खाल्ले पाहिजे. 



अमीर चंद सांगतात. माझा जन्म लाहोरमध्ये झाला. फाळणीनंतर आमचे कुटुंब लाहोरहून गुजरवाला आणि नंतर जम्मूला गेले. जम्मू नंतर आम्ही अमृतसरला गेलो आणि नंतर पंजाबमधील लुधियाना येथे स्थायिक झालो. पंजाबमध्ये येताना आमच्या कुटुंबाने सोबत काहीच आणले नव्हते. त्यामुळे वडिलांसोबत आम्ही खूप कष्ट केले. महाविद्यालयात प्रवेश घेताना प्राचार्यांनी स्पर्धा जिंकल्यास प्रवेश दिला जाईल, अशी अट घातली. प्राचार्यांनी मला त्यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायला लावली. यात मी जिंकलो, त्यानंतरच मला प्रवेश दिला.  


महत्वाच्या बातम्या


PHOTO : कर्करोगावर मात करून 88 वर्षीय बॉडीबिल्डरचा तरूणांना लाजवेल असा फिटनेस, पाहा फोटो