उन्नावः BJP चे खासदार साक्षी महाराज नेहमीच वादग्रस्त वक्तवं करत असतात. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, सुभाषचंद्र बोस हे नेहरु आणि गांधी यांच्यापेक्षा लोकप्रिय होते. म्हणून काँग्रेसनं बोस यांची हत्या केली. उन्नावमध्ये सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती कार्यक्रमात भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे की, "सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दारात ढकललं गेलं. माझा आरोप आहे की, काँग्रेसनंच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवून आणली आहे. बोस यांची लोकप्रियता पंडित नेहरु आणि महात्मा गांधी यांच्यापेक्षा अधिक होती, असं त्यांनी म्हटलंय.




साक्षी महाराज म्हणाले की, "सुभाषचंद्र बोस यांनी नारा दिला की, 'तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा'. इंग्रज इतके सरळ नव्हते की मागून स्वातंत्र्य देतील. या स्वातंत्र्यासाठी कित्येकजण शहीद झाले आहेत. रक्ताच्या भावाने आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे, असं ते म्हणाले.




मुस्लिम असो वा साधू, दफन नको, सर्वांचं दहन करा : साक्षी महाराज


पंतप्रधान मोदींकडून पराक्रम दिवस साजरा करण्याचं आवाहन
सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीदिनाला भाजपनं पराक्रम दिवस म्हणून साजरा केला. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी पंतप्रधान मोदी कोलकात्याला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रत्येक वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस’ म्हणून साजरं करण्याचं आवाहन केलं.