नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणारे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडलं आहे. वाढत्या लोकसंख्येवर बोलत असताना साक्षी महाराज यांनी या समस्येला मुस्लिम समाजाला दोषी ठरवलं. शिवाय, हिंदू महिलांनी चार मुलं जन्माला घालावी, असं आवाहनही केलं. यावेळी साक्षी महाराज यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरही वादग्रस्त विधान केलं.


मेरठमधील सभेत साक्षी महाराजांनी नव्या वादात उडी टाकली. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून साक्षी महाराजांच्या भाषणाचा रिपोर्ट मागितला आहे.

साक्षी महाराजांच्या वादग्रस्त विधानामुळे विरोधकांना आता चांगलाच मुद्दा मिळाला असून, साक्षी महाराजांवर टीका सुरु केली आहे. शिवाय, केंद्र सरकारकडून साक्षी महाराजांच्या विधानांवर स्पष्टीकरणाचीही विरोधकांनी मागणी केली आहे.

उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. तारखा जाहीर झाल्या असून, आचारसंहिताही लागू झाली आहे. या दरम्यान साक्षी महाराज यांनी वादग्रस्त विधान केल्याने निवडणूक आयोगानेही तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवला.

याच सभेत प्रशासनाच्या वतीने साक्षी महाराजांच्या भाषणाची व्हिडीओग्राफी करण्यात येत होती. मात्र, उपस्थित साधूंनी व्हिडीओग्राफी करणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की केली.

जात आणि धर्माशी संबंधित साक्षी महाराज यांनी केलेल विधान वादग्रस्त आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे, असे काँग्रेस नेते के. सी. मित्तल म्हणाले.

"देशात वाढत्या लोकसंख्येची मोठी समस्या निर्माण होत आहे आणि या समस्येसाठी हिंदू जबाबदार नाही. ज्यांच्या चार पत्नी आहे आणि जे 40 मुलांचा विचार करु शकातात, ते लोकसंख्येच्या समस्येला जबाबदार आहेत", असे काल साक्षी महाराज म्हणाले.