एटाह : वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. मुस्लिमांच्या अंतिम संस्कार विधींवर टिपण्णी करुन साक्षी महाराजांनी पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे.


'मी पंतप्रधानांच्या वक्तव्याशी सहमत नाही. दफनभूमी बनवण्याची आवश्यकताच काय? दफनभूमीतच भारतातली सगळी जमीन व्यापली, तर शेतं कुठे होणार?' असा प्रश्न साक्षी महाराजांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत हिंदूंना स्मशानभूमी अपुऱ्या पडत असल्याचा मुद्दा उचलला होता.

'जगातील इतर मुस्लिमबहुल देशात मृतदेहांना अग्नि दिला जातो, त्यांचं दफन होत नाही. देशात जवळपास 20 कोटी मुस्लिम नागरिक आहेत. प्रत्येकाची कबर बांधायची असल्यास जागा कशी उपलब्ध होणार' असा सवाल साक्षी महाराज यांनी उपस्थित केला.

'मुस्लिमांसोबतच साधूंचीही समाधी बांधली जाते. यामुळे जागा अपुरी पडते. त्यामुळे प्रत्येकाचं दहन करुन अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे. मग तो संन्यासी असो किंवा मुसलमान' असं मत साक्षी महाराजांनी व्यक्त केलं.

साक्षी महाराज हे मध्य प्रदेशातील उन्नावमधून भाजपचे खासदार आहेत. यापूर्वीही हिंदूंनी चार मुलं जन्माला घालावीत, राहुल गांधींच्या केदारनाथ दर्शनामुळे भूकंप यासारखी वक्तव्य केल्यामुळे साक्षी महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.