नवी दिल्ली : देशातील आर्थिक स्थिती आणि आर्थिक धोरणांबाबत पहिल्यांदाच भाजपमधून विरोधाचा सूर उमटला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवरुन सरकारला धारेवर धरलं आहे. मंदीत नोटीबंदी करुन आगीत तेल ओतण्याचं काम केल्याची टीका सिन्हांनी केली आहे.


इंग्रजी वृत्तपत्र 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये यशवंत सिन्हा यांनी लेख लिहिला आहे. यामधून त्यांनी देशाचे विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

सिन्हा यांनी नेमकी काय टीका केली आहे?

"पंतप्रधान दावा करतात की, त्यांनी अत्यंत जवळून गरिबी पाहिली आहे. त्याचवेळी, देशातील प्रत्येक नागरिकाने गरिबी जवळून पाहावी, यासाठी त्यांचेच अर्थमंत्री दिवस-रात्र मेहनत करतायेत.", अशी जळजळीत टीका यशवंत सिन्हा यांनी अरुण जेटलींवर केली आहे. शिवाय, "अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेची जी अवस्था करुन ठेवलीय, त्यावर मी आता बोललो नाही, तर ते माझ्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याशी धोका केल्यासारखं होईल. मला माहिती आहे, मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपचे अनेक लोक सहमत होतील. मात्र भीतीमुळे ते बोलत नाहीत.", असेही यशवंत सिन्हा यांनी लेखात म्हटलं आहे.

यशवंत सिन्हा यांनी पुढे म्हटलंय की, "खासगी गुंतवणुकीत जितकी घसरण झालीय, तितकी गेल्या दोन दशकात झाली नाही. औद्योगिक उत्पन्नाची स्थिती बिकट आहे, कृषी क्षेत्रातही समस्या वाढल्यात, रोजगार उपलब्ध करणारे उद्योगधंदेही संकटात आहेत. नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली आहे. त्याचवेळी, जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भयावह स्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार होत आहेत."

विकास दरातील घसरणीबाबतही यशवंत सिन्हांनी नाराजी व्यक्त करत अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. "पहिल्या तिमाहीत विकास दर घसरुन 5.7 टक्के झाला. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यात सरकारचे प्रवक्ते म्हणतात, नोटाबंदीमुळे मंदी आली नाही. त्यांचं बरोबर आहे. कारण मंदीची सुरुवात आधीच झाली होती. नोटाबंदीने केवळ आगीत तेल ओतण्याचं काम केलं गेलं आहे.", असेही यशवंत सिन्हा यांनी लेखात म्हटले आहे.

अर्थमंत्र्यांवर इतकी तिखट टीका करणारे यशवंत सिन्हा कोण आहेत?

यशवंत सिन्हा हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये सिन्हा हे अर्थमंत्री होते. ते माजी आयएएस अधिकारी आहेत.  यशवंत सिन्हा यांचे पुत्र जयंत सिन्हा हे मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत.