पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. या केंद्रात 414 हॉल बनवले आहेत. या सर्व केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएम मतं मोजली जातील. नऊ वाजता पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. तर दुपारपर्यंत संपूर्ण निकाल स्पष्ट होईल, असं म्हटलं जात आहेत. नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल.


बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यात मतदान झालं होतं. सर्व टप्प्यांमध्ये झालेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. यानंतर पुढील पाच वर्षांत बिहारची सत्ता कोणाकडे जाणार हे ठरणार आहे. बिहार राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार पूर्व चंपारण, सीवान, बेगुसराय आणि गयामध्ये प्रत्येकी तीन तर नालंदा, बांका, पूर्णिया, भागलपूर, दरभंगा, गोपालगंज, सहरसामध्ये प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्र बनवले आहेत.


Bihar Election 2020 Exit Poll Results : बिहार निवडणुकीत एनडीए-महागठबंधनमध्ये कांटे की टक्कर; कोणालाही स्पष्ट बहुमत नाही


एक्झिट पोल काय सांगतात?
एबीपी-सी-वोटरच्या एक्झिट पोलमध्ये एनडीला 104-128 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महागठबंधनला 108-131 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त चिराग पासवान यांच्या एलजेपीला केवळ 1 ते 3 जागांवरच विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांच्या पारड्यात 4 ते 8 जागा जाण्याची शक्यता आहे.


गठबंधनमध्ये कोणाला किती जागा मिळू शकतात?
एबीपी न्यूज-सी-वोटरच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला 38 ते 46 जागा मिळू शकतात. तसेच भाजपला 66 ते 74 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. व्हीआयपीला 0-4 जागा आणि हमला 0-4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


याव्यतिरिक्त महागठबंधनचं पाहिलं तर आरजेडीला 81-89 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आणि काँग्रेसला 21 ते 39 जागा मिळू शकतात. याव्यतिरिक्त डाव्या पक्षांना 6 ते 13 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे.


कोणी किती जागांवर निवडणूक लढवली?
एनडीएमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूने 115 जागांवर भाजपने 110, विकासशील इन्सान पार्टीने 11 आणि जीतनराम मांझी यांच्या हम (हिंदुस्थानी अवाम मोर्चा) ने 7 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.


परंतु, यंदाच्या वेळी बिहार निवडणुकीत लोजपाची साथ एनडीएला मिळालेली नाही. एलजेपीचे प्रमुख चिराग पासवान यांनी वेगळा मार्ग निवडत एकट्याने निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे.


महागठबंधनमध्ये आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) 144 जागांवर निवडणूक लढणार आहे. यांच्यासोबत काँग्रेस 70 जागांवर लढत आहे. CPI-(एमएल) 19 जागांवर, सीरीआय 6 जागांवर आणि सीपीआय एम 4 जागांवर निवडणूक लढत आहे.